Monday 3 February 2020

ज्ञानपीठासाठी भैरप्पा पात्र नाहीत का ?


ज्ञानपीठासाठी भैरप्पा पात्र नाहीत का ? हा प्रश्‍न अनेक वर्षांपासून केवळ कन्नड वाचकांना नव्हे तर त्यांना मानणार्‍या इतर भाषिक वाचकांनाही पडला आहे. तसेच यामागे काही कारणे असतील असे वाटणारेही आहेत. 
कदाचित भैरप्पा यांच्या जागी मीच असतो तर आतापर्यंत दुसर्‍यांदा ज्ञानपीठसाठी लॉबिंग केलो असतो की काय! कारण माझे साहित्यिक कार्य तेवढे आहे या अभिमानामुळे! 
होय, हा अभिमान आहे ना, तो सहज निर्माण होत नाही, तो कमवावा लागतो. एखाद्या वेळेस भैरप्पा यांच्यात तसा अभिमान असल्यास तो त्यांच्या ज्ञानामुळे मिळविलेला आहे,  सुखासुखी निर्माण झालेला नव्हे. सुखासुखी निर्माण होणारा अभिमान नव्हे, ती चरबी असते. 
ज्ञानामुळे निर्माण होणारा अभिमान मान्य होईल. एका मर्यादेत असल्यास तो गौरवास्पद असेल. असो, तो विचार बाजूला ठेवा. का इतक्या दीर्घ काळानंतरही भैरप्पा हे ज्ञानपीठ पुरस्कारासाठी पात्र ठरले नाहीत, हा प्रश्‍न माझ्यासारख्या अनेकांना खराच सतावत आहे. 
गोकाक, अनंतमूर्ती, कर्नाड, कंबार यांच्यासारख्यांना ज्ञानपीठ मिळाले. तर या सर्वांच्या रांगेत उभे राहण्याइतके साहित्याची सेवा भैरप्पा यांनी केली नाही का? ज्ञानपीठ हे साहित्य क्षेत्रासाठी आहे. केवळ साहित्य क्षेत्रासाठीच असलेल्या या पुरस्कारासाठी भैरप्पा हे पात्र ठरले नाहीत म्हणजे त्यांच्या साहित्य निर्मिती आणि सेवेविषयी माझ्यासारख्यात संशय निर्माण होतो. मात्र, सत्य हे आहे की, भैरप्पा यांची साहित्य रचना, सेवा आणि प्रतिभा नाकारणे कोणाकडूनही शक्य नाही. एखाद्या वेळेस नाकारल्यास वरील चारही साहित्यिकांच्या साहित्य रचना, सेवा आणि प्रतिभेला नाकारल्यासारखे होईल! 
सरळच सांगतोय, या गोष्टीचा कोणी चुकीचा अर्थ लावू नये. लॉबिंग न करता कोणताही पुरस्कार मिळवणे (हिसकावणे) साध्यच नसलेला हा काळ आहे. कर्नाड यांनी मी लॉबिंग करुनच ज्ञानपीठ मिळविल्याचे जाहीररीत्या कबुल केले होते. मला ज्ञानपीठ मिळाले तेव्हा ते विजय तेंडुलकर यांना मिळायला हवे होते, असे त्यांनीच म्हटले होते! आतापर्यंत देण्यात आलेले सर्वाधिक पुरस्कार आणि पुरस्कार विजेते (सर्वच नव्हेत) यांनी लॉबिंग करुनच मिळविलेले आहे, हा भाव लोकांत आहे. 
जिल्हा, राज्योत्सव पुरस्कारासाठीच लॉबिंग चालते म्हटल्यावर आणखी ज्ञानपीठ, पद्म पुरस्कारांसाठीही लॉबिंग चालत नाही म्हणायचे तर यावर विश्‍वास ठेवणे खूपच कष्टदायक आहे !
हा लॉबिंगचा काळ आहे. पुरस्कारच नव्हे तर प्रत्येक गोष्टीला लॉबिंग केल्याशिवाय अथवा करायला लावल्याशिवाय काहीही मिळत नाही. भैरप्पा यांनी लॉबिंग न केल्याने त्यांना ज्ञानपीठ मिळाले नाही. लॉबिंग केल्यास कधीच ज्ञानपीठ मिळाले असते, अशी साहित्य वर्तुळात चर्चा आहे. वाचकांच्या वर्तुळातही हीच चर्चा आहे. त्यांना अजून का ज्ञानपीठ मिळाले नाही, त्यांच्याशिवाय इतरांना मिळाले तरी ते मिळाल्यासारखे नाही, असा अतिरेकी विचारही मी ऐकलो आहे. अरे, भैरप्पा लॉबिंग केले असते तर मिळाले असते, असे व्यंगात्मक बोलणेही ऐकले आहे. 
मात्र, भैरप्पा यांचा गुणस्वभाव माहीत असलेले कोणीही त्यांनी पुरस्कारासाठी लॉबिंग करतील हा विचार सोडा, अशा संधीसाधू राजकारणात ते उतरतील हा विचारही करणे साध्य नाही. देहि हा त्यांचा स्वभाव नाही. तशी अभिरुचीही त्यांची नाही. मंगळुरू लिट. फेस्टमध्ये त्यांना दिलेला गौरव निधी त्यांनी कल्लड्क श्रीराम माध्यमिक शाळेला दिला. सरस्वती सन्मान प्राप्त भैरप्पा यांना कोणत्याही कारणासाठी, कोणत्याही परिस्थितीत लॉबिंग करण्याची दुस्थिती येणार नाही, असे माझ्यासारख्याला वाटते. आता तर मोदी सरकार आहे. लॉबिंग करायचेच तर त्यांना वाटेल ते पद मिळविण्यास अनुकूलता आहे. 
सत्ताधार्‍यांची खुशमस्करी करुन पद, पदवी, पुरस्कार मिळविणे हे एका रीतीने बौद्धिक आणि वैचारिक गुलामीच आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, बौद्धिकदृष्ट्या उजव्या विचारसरणीचे म्हणूनच भैरप्पा यांची गणना केली गेली आहे. अथवा तसेच त्यांच्याकडे पाहिले गेले आहे. हे चुकीचे आहे. कादंबर्‍या पाहून, त्यातच आवरण कादंबरी वाचून त्यांना तसे समजणे चुकीचे आहे! आणखी त्यांचे सामाजिक विचार पाहून त्यांना तसे समजणे बौद्धिक दारिद्य्रच होय! 
भैरप्पा यांना चिकटलेले विवाद म्हणजे 1. त्यांनी त्यांच्या कादंबर्‍या लेखनासाठी निवडलेले विषय. 2. त्यांच्या काही प्रमुख कृती (वंशवृक्ष, तब्बलियू निनादे मगने, पर्व, सार्थ, आवरण, उत्तरकांड). यात भारताच्या पुरातन संस्कृतीचे सार आहे. त्यामुळे ते काही साहित्यिकांमुळे, विशेषकरुन नवसाहित्यिकांच्या टिकेचे लक्ष्य बनले. 3. वाद्यांवर राष्ट्रगीत वाजवल्याच्या प्रकरणात इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांचे समर्थन केले. 4. कावेरी विवादाच्या निषेधाला हिंसक वळण लागले. हिंसा, निषेधामुळे काही साध्य होणार नसल्याचे नारायण मूर्ती यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्यामुळे. 5. टिपू सुलतान धर्म सहिष्णू असल्याचे वक्तव्य गिरीश कर्नाड यांनी केले होते. भैरप्पा यांनी दैनिक विजय कर्नाटकमधून त्याचे खंडन केले. कर्नाड हे टिपू सुलतान याच्याविषयी चुकीचे विचार पसरवत आहेत. विनाकारण धर्म सहिष्णू म्हणून त्याच्या व्यक्तिमत्वाचे उदात्तीकरण करत आहेत. टिपू सुलतान एक धर्मांध होता. तो हिंदूंचा द्वेष करत होता हे सांगितले. 6. अनंतमूर्ती हे भैरप्पा यांच्या कादंबर्‍यांचे प्रमुख टीकाकार होते. भैरप्पा यांनी आपल्या आणि अनंतमूर्ती यांच्यातील वाद - विवाद भित्ती आणि नानेके बरेयुत्तेने या कृतींच्या काही भागात उल्लेख केला. 7. मुस्लिम राजवटीतील भारतीय संस्कृती आणि सामाजिक प्रगतीवर झालेला परिणाम दाखविणारा, ऐतिहासिक सत्यावर आधारित आवरण लिहिले. 8. भैरप्पा हे इतिहासाच्या नावाखाली समाजात दुही माजवून राज्य करू इच्छिणारे मूलतत्ववादी आहेत. तसेच त्यांना कादंबरी लिहिण्याचे ज्ञान नाही, असे वक्तव्य अनंतमूर्ती यांनी केले. त्यामुळे त्यांना साहित्य क्षेत्रात टिकेला सामोरे जावे लागले. 9. मात्र, भैरप्पा यांनी आपण कोणत्याही विषयी पूर्वग्रह न ठेवता केलेल्या सत्यान्वेषणाचे आवरण हे फळ असल्याचे सांगत बाजू मांडली. टीकाकारांनी कोणत्याही निर्णयाला येण्यापूर्वी कादंबरीत उल्लेख केलेल्या संदर्भ ग्रंथांचे अध्ययन करावे असे सांगितले. 10. दैनिक विजय कर्नाटकात प्रसिद्ध झालेल्या भैरप्पा यांच्या मतांतर मत्तु कवलु लेखनावर खूप दिवस समर्थनार्थ आणि विरोधात चर्चा चालली, लेख प्रसिद्ध झाले. 11. कवलु कादंबरी खूपच चर्चेचा, विवादाचा विषय ठरली. आधुनिक महिला सिद्धांतातील फोलपणा आणि त्याचा सामाजिक परिणाम हाच वस्तूविषय निवडून ही कादंबरी लिहिली. त्यामुळे महिला प्रगती विरोधी हा शिक्का त्यांच्या माथ्यावर मारला गेला. सारा अबुबकर यांनी ती कादंबरी कोणी वाचू नये, असे एका समारंभात जाहीररीत्या सांगितले. 
मुख्यत: भैरप्पा हे उजव्या विचारसरणीचे आहेत, हा जुना आरोप या अकरा कारणांमुळे त्यांना ज्ञानपीठ मिळाले नाही, ही विवादात्मक चर्चा चालत आली आहे. 
ज्ञानपीठ पुरस्कारासाठी साहित्यकृतींच्या निवडीचा विचार पाहू. 18 भारतीय भाषांतील अमूल्य कृतींचे प्रतिष्ठानची निवड समिती परिशीलन करते. पुरस्कारासाठी निवडली जाणारी व्यक्ती प्रतिभावंत, प्रतिष्ठित आणि सृजनशील साहित्यिक असावी. साहित्य क्षेत्रात विविध प्रकारची साहित्य निर्मिती करुन यशस्वी झालेली असावी. 18 भाषांत अत्युन्नत स्थान प्राप्त केले तरच ज्ञानपीठ पुरस्कारासाठी कृती निर्मात्याची निवड होते. ज्ञानपीठ पुरस्कारामुळे त्या साहित्यिकासह त्याने निर्मिलेल्या साहित्याची भाषा आणि त्याच्या प्रांतालाही सन्मान प्राप्त होतो. 
ज्ञानपीठ पुरस्काराठीचे नियम सूची म्हणजे 1. साहित्यिक आणि कृती भारतीयच असावी. 2. त्याने आपल्या संबंधित भाषेत पंडित, तज्ज्ञ असावा. 3. पुरस्कार देताना ती व्यक्ती जीवंत असावी. 4. एकदा पुरस्कार दिलेल्या व्यक्तीला कोणत्याही कारणांनी पुन्हा पुरस्कार देऊ नये. 4. एकदा कोणत्याही एका भाषेला पुरस्कार दिल्यास त्यानंतर तीन वर्षांपर्यंत त्याच भाषेच्या कोणत्याही साहित्यिकाला हा पुरस्कार देऊ नये. देशात आतापर्यंत 18 भाषांना दिलेल्या ज्ञानपीठ पुरस्कारांत हिंदी भाषेनंतर सर्वाधिक पुरस्कार कन्नड भाषेला मिळाले आहेत. त्यामुळे कन्नड भाषेचा मान आणि सन्मान उंचावला आहे.
ज्ञानपीठाच्या नियमांनुसार भैरप्पा हे त्यासाठी पूर्णपणे पात्र आहेत. केवळ नियमांचे अवलोकन करुन त्यानुसार भैरप्पा हे त्यासाठी पात्र आहेत, असे मला वाटत नाही, वाटूही नये. भारतातील साहित्याला दिल्या जाणार्‍या श्रेष्ठ पुरस्कारासाठी श्री. साहू शांतिप्रसाद जैन दांपत्याने या भारतीय प्रतिषठानाची स्थापना केली. साहजिकच जैन तत्त्वज्ञानालाही हे प्रतिष्ठान पुरस्कार देत आला आहे. जे साहित्य मानवी जीवनातील संवेदनशीलता आणि संवेदना अभिव्यक्त करते अथवा चैतन्य भरते असे साहित्य सर्वमान्यता, सार्वकालिक मौल्यवान ठरते. भारतीय साहित्यात चिरस्थायी बनते. ज्ञानपीठ मिळविलेले आतापर्यंतचे साहित्यिक आणि साहित्याचे अवलोकन केल्यास हे अधिक ग्राह्य ठरते. 
मानवजात ही एकच आहे, यावर पंप यांनी भर दिला. पंप, रन्न, पोन्न, नागचंद्र आदी जैन साहित्यिकांपासून दासांपर्यंतच्या साहित्यामुळे संपन्न बनलेली कन्नड साहित्य परंपरा देशी भाषांत अभिन्न आहे. वैशिष्ट्यांचा आगर आहे. जी साहित्यकृती समाजाच्या हितासाठी जीवनमूल्यांचे संवर्धन करते ती सार्वकालिक सत्य बनून राहते. भैरप्पांच्या कृतींचे हे मूलस्त्रोत होय. जे साहित्य सकल जीवनिष्ठेने जीवनमूल्यांचे प्रतिनिधीत्व करते ते समाज स्वीकारते, स्वीकारायलाही हवे. भैरप्पांच्या कादंबर्‍यांची ही खरी अस्मिता आहे. अशा प्रकारच्या अगाध अनुभव चिंतनेने त्यांच्या कादंबर्‍यांतील मुख्य पात्रे उलगडतात.    
कारंत यांच्या मूकज्जीय कनसुमधील मुकी आजी ही बोलता न येणारी मुकी म्हातारी नव्हे. 80 वर्षांची एक मौनी म्हातारी आहे. वर्षानुवर्षे विशाल प्रांगणातील एका अश्‍वत्थ वृक्षाखाली बसून एक महिला वेदना सहन करत मानवी विषमता उलगडून सांगते. सिंहावलोकन करत, मनातच विचार करत आपल्यात एक अद्भुत जागृती निर्माण करताना दिसते. समष्टीच्या धर्तीवर भूतकाळाचा वर्तमानकाळाशी सांगड घालत मानवी सभ्यतेच्या विकासाचा तिचा प्रयत्न रोमांचक आहे. करुणा ही जीवनातील सर्वात मोठी शक्ती आणि मनुष्यत्वाचे अत्यंत मोठे गुण ती शिकवते. भैरप्पांच्या कादंबर्‍यांत अशा पात्रांची मालिकाच आहे. कसे तरी लाभलेले हे जीवन कसेही जगले तरी तरी चालेल, अशा प्रकारचे मानवी जीवन नाही, अशी मूल्ये कारंतांच्या मूकज्जीसारखी पात्रे सांगतात. अशी पात्रे भैरप्पांच्या कादंबर्‍यांतही दिसतात. या कारणांमुळे भैरप्पा यांच्या कादंबर्‍या वाचताना अनेक संदर्भात कारंत यांच्या सर्जनशील आणि प्रतिभावान सामर्थ्याची आठवण होते.  दोघांचीही चिंतन शक्ती आणि जीवन अंतर्दृष्टी एकच वाटते. कारंतांप्रमाणे भैरप्पा यांनी निवडलेली कथावस्तू, तंत्र, भाषा आणि निरुपण शैली यामुळे त्यांच्या कादंबर्‍या चैतन्यप्रद ठरतात. त्याची व्याप्ती विस्तृत आहे. तसेच कादंबरी आपले लक्ष्य गाठत जिंकते. हवे ते साध्य करते. 
भैरप्पा यांच्या साहित्य रचनेची व्याप्ती खूप मोठी आहे. वास्तवतेची चौकट मोडून काल्पनिक चौकटीत त्यांनी कोणतीही कादंबरी लिहिलेली नाही, लिहिणारही नाहीत. कथेनुसार निर्माण केलेली पात्रे काल्पनिक असतात, ही साहित्यातील सहज क्रिया आहे, हा वेगळा विषय आहे. त्याला कधीही कोणी अपवाद नाही. कादंबर्‍यांची सुरुवातच वास्वतेच्या पार्श्‍वभूमीवर झालेली आहे. भैरप्पा हे भ्रम निर्माण न करता वास्तवतेच्या आधारावर संशोधन करुन लिहिणार्‍या संशोधकांच्या रांगेतील साहित्यिक आहेत. केवळ जे स्वत:वर मात करू शकतात तेच कठोर विचार मांडणे असो, चिंतन करणे असो अथवा लिहिणे शक्य आहे. वेद आणि उपनिषद हे देशाच्या संपूर्ण संस्कृतीचे मूळ आहेत. - असे सांगणारे साहित्यिक भैरप्पा पुराण भंजन करुन, वास्तव जीवनाचा शोध घेतल्यानेच पर्व, उत्तरकांड यासारख्या सृजनात्मक कृतींची निर्मिती त्यांच्याकडून झाली असेल! ‘
"Literature is a way of discovering human truths in its emotional and aspirational aspects. साहित्यिकाने या समाजाला कोणती जीवनमूल्ये द्यावीत, हे त्यांनी सांगितले आहे. : No one asks how Draupadi must have felt having five husbands, Or which one she might haved loved more. In Parva I tried to change the motivation for Gandhari about why she wears a patch around her eye. In Uttarakhanda , I reinterpreted the Ramayana from Sita's point of view"
एका सर्जनशील लेखकाच्या कादंबरीतील पात्रे एका जीवंत जीवनाच्या निरंतर यानाप्रमाणे मूल्यांचे विस्ताराने, विस्तीर्णपणे प्रतिपादन करतात !
  शेवटची गोष्ट : भैरप्पा यांना ज्ञानपीठ देऊच नये, मिळूच नये यासाठी ऊर फाटेस्तोवर प्रयत्न करणारेही आहेत. पूर्वग्रह वगळता दुसर्‍या कोणत्याही कोनातून अशा गोष्टींचे समर्थन करणे शक्य नाही. भैरप्पा यांचे साहित्य न वाचताच केलेल्या या कोरड्या गोष्टी आहेत. मागे एकदा भैरप्पा यांना मरणोत्तर ज्ञानपीठ द्या, अशी मागणी करण्यात आली होती. अशी असभ्य संस्कृतीहीन वक्तव्ये करणारी मंडळीही आहेत. अशा प्रकारची भाषा करणार्‍यांत बहुतांश कन्नड भाषिकच आहेत, हे खेदजनक आहे. 
भैरप्पा यांच्या साहित्य विचारांचे समर्थन करणार्‍या एका ज्येष्ठ व्यक्तीला चप्पल दाखवणारे महाभागही आहेत. कोणाला कधी पुरस्कार द्यावा अथवा मिळावा, हा विचार मांडण्यासाठी कोणताही पुरस्कार कोणाच्याही मालकीची संपत्ती नाही, ती त्यांची मालमत्ताही नाही. भारतीय ज्ञानपीठाचे मोठेपण आणि गौरव खूप मोठे आहे. प्रतिष्ठानच्या कार्यक्षेत्राची व्याप्तीही खुप व्यापक आहे. भारतीय साहित्य विश्‍वात भारतियांना दिला जाणारा हा श्रेष्ठ पुरस्कार भारतीय साहित्य जगतात आपल्या लेखनाने जनमान्यता मिळविलेल्या भैरप्पा यांना मिळायलाच हवा. ते त्याला पात्र आहेत. भारतीय ज्ञानपीठ नावाच्या शुद्ध सरोवरातील पुष्करणीतील अनेक कमळांच्या रांगेत भैरप्पा नावाचा कमळही फुलायला हवा, ही साहित्यप्रेमींची खूप दिवसांपासूनची इच्छा आहे. निवड समितीत प्रत्येक भाषेचे दोन, तीन प्रतिनिधी असतात. त्यातील कन्नड भाषेच्या प्रतिनिधींनी भैरप्पा यांच्या कन्नड साहित्य सेवेची गहनता समितीपुढे विषद करुन सांगायला हवे. तसेच त्यांच्याकडे मागणी करुन भैरप्पा यांच्या माध्यमातून कन्नड भाषेला नववे ज्ञानपीठ मिळेल, यासाठी प्रयत्न करायला हवेत.  
टी. देविदास

भारतीय साहित्य क्षेत्रातील अनन्य कृती : पर्व

 
डॉ. एस. एल. भैरप्पा यांची पर्व कादंबरी प्रकाशित होऊन 40 वर्षे झाली. त्यानिमित्त बंगळुरूमध्ये 29 डिसेंबर रोजी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात केंद्र साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार, महाराष्ट्राचे डॉ. मुकुंद आर. परांजपे, ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. माधव कौशिक, प्रसिद्ध मराठी लेखिका, संशोधक डॉ. अरुणा ढेरे यांनी सहभाग नोंदवला. भैरप्पा यांच्या उपस्थितीत या लेखकांसह शतावधानी डॉ. आर. गणेश यांनी संवाद साधला, हे विशेष होय. 
राष्ट्रीय लेखक म्हणून ख्याती मिळवलेले, प्रा. डॉ. एस. एल. भैरप्पा हे कन्नडची कीर्ती देश - विदेशात वाढवलेल्या लेखकांत अग्रगण्य आहेत. त्यांची पर्व ही कादंबरी महाभारतावर आधारित असली तरी पौराणिक आवरण काढून टाकून, वास्तवतेच्या पार्श्‍वभूमीवर ऐतिहासिकता सत्य आणि संभाव्यतेच्या स्वरुपात मांडण्यात अत्यंत यशस्वी झालेली साहित्यकृती आहे. भारतीय भाषांमध्ये लिहिली गेलेली महाभारताशी संबंधित कोणतीही साहित्यकृती ‘पर्व’ इतके महत्त्व अथवा जनप्रियता मिळवू शकली नाही, हेच ‘पर्व’ची महानता सांगणारे आहे.   
उदाहरण म्हणून एखाद दुसर्‍या अभिप्रायाकडे लक्ष वेधता येईल. प्रसिद्ध कवी, कादंबरीकार रामेश्‍वर शुक्ल आंचल यांनी म्हटले होते, ‘पर्व... कन्नडची असेल. मात्र, मी म्हणेन की ती एक मूळ हिंदी कादंबरी आहे.’ तर दुसरे प्रसिद्ध हिंदी लेखक कमलेश्‍वर यांनी ‘पर्व एक आधुनिक बृहतकाव्य आहे. मीच याचा लेखक असतो तर हा विचार माझ्या मनी येतो’ अशी असूयापर प्रशंसा केली आहे. राजस्थानी विद्वान नंदकिशोर आचार्य यांनी ‘भैरप्पा हे केवळ कन्नडचे नव्हेत, आधुनिक भारतीय साहित्याचे, तुलना करता न येणारे विभूती पुरुष आहेत.’ असे म्हटले आहे. भैरप्पा यांना ‘कन्नडमध्ये लिहिणारे मराठी साहित्यिक’ मानणार्‍या मराठी विद्वानांमधील एक असे चंद्रकांत बांदिवडेकर म्हणतात. ‘महाकाव्याचा अनुभव देणारी ‘पर्व’सारखी कृती मराठीमध्ये कधी तरी येईल, याची मी वाट पाहात आहे.’ त्याशिवाय ‘पर्व वाचल्यानंतर मी भैरप्पा यांचा भक्त झालो आहे.’ असेही म्हटले आहे. 
समकालीन साहित्य समाचार पत्रिकेत हिंदी लेखक ओम गुप्त हे आणखी एक पाऊल पुढे टाकत वर्णन करतात, ‘महाभारतावर आधारित कादंबर्‍यांचे सर्व भारतीय भाषांमध्ये लेखन झाले आहे. मात्र, पर्व सर्वांपेक्षा विशेष आहे. ही यातील पात्रांची कथा नाही; पात्रांच्या अंतर्यामी लपलेल्या मानवी संबंधांची कथा आहे.’ महाभारताचे आजचे स्वरूप पाहिल्यावर महर्षी व्यास यांना मुख्यत: वासुदेवाची महिमा सांगायची होती, हे स्पष्ट होते. कन्नडमध्येही व्यास भारताच्या आधारावर काव्यांची रचना दिसून येते. यात जैन आवृत्ती आणि वैदिक आवृत्ती मुख्य आहेत. (बौद्ध आवृत्ती उपलब्ध नाही.) नेमिनाथांचे चरित्र लिहिणारे नेमिचंद - कर्णपार्य यांच्या रचना जैन आवृत्ती आहेत. पंपने ‘मिगिल ईवर्गळीन ई भारत लोकपूज्यं’ या आपल्या गौरवमालेत कृष्णाचे नावच वगळले आहे. कृष्णाची महिमा सांगणारा अक्षयवस्त्र प्रसंग, अक्षयपात्र प्रसंग, गीतोपदेश यासारखे प्रसंग वगळले आहेत. 
कृष्णाची कथा समजून सांगतो, असे सांगणारे कुमार व्यास कृष्णाची महिमा सांगणारा कोणताही प्रसंग सोडत नाहीत. नवे प्रसंगही जोडतात. पंपला त्याचा आश्रयदाता अरसिकेरी (त्याचे प्रतिरुप म्हणून अर्जुन) मुख्य वाटतो. (त्यामुळे शेवटी सिंहासनावर बसणारे अर्जुन - सुभद्रा आहेत. धर्मराज - द्रौपदी नाहीत.) कुमार व्यास कृष्णभक्त असल्याने कृष्ण हाच त्यांच्यासाठी नायक आहे. 
अभ्यास-प्रवास : भैरप्पा यांनी व्यास भारताचा (गोरखपूर आवृत्ती) मूलगामी अभ्यास केला आहे. वाय. एस. सुखठणकर यांची आवृत्ती बाजूला ठेवली आहे. कुमार व्यास भारताचे भाग त्यांना तोंडपाठ आहेत. पंप - रन्न यांचेही अवलोकन केले आहे. मात्र, त्यांचे ध्येय-आशयच भिन्न आहे. ‘नानेके बरेयुत्तेने’ आणि ‘पर्व बरेदद्दु’ या लेखनात आपल्या ध्येय-उद्देशाविषयी स्पष्ट केले आहे. केवळ महाभारतातील घटना घडलेल्या प्रदेशांनाच नव्हे तर त्यात उल्लेखिलेल्या बहुपत्नीत्व, नियोग आदी पद्धती अजूनही असलेल्या गढवालसह अन्य ठिकाणांना भेटी देऊन तेथील लोकांशी संवाद साधला. भारतीय पुरातत्व खात्याने उत्खनन केलेल्या ठिकाणांची पाहणी केली. काहीवेळा वेशांतर करून, शारीरिक, मानसिक त्रास सोसून, दीर्घकाळ विनावेतन रजा घेऊन विषयतज्ज्ञ, इतिहासतज्ज्ञांशी चर्चा केली. राजाजी, के. एम. मुन्शी, देवेंद्र शर्मा, ठाकर आदींच्या साहित्याचे अध्ययन केले. व्ही. सीतारामय्या, डॉ. प्रभूशंकर, प्रो. एस. बालसुब्रह्मण्यम, बी. व्ही. सुब्बरायप्पा आदी विद्वानांशी आणि तज्ज्ञांशी सल्लामसलत करून कृतीची रचना केल्याचे भैरप्पा यांनीच ‘पर्व बरेदद्दू’मध्ये सांगितले आहे. 
महाभारताची पुनर्रचना करण्यामागे ‘समाजाशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र अशा अनेक कोनातून प्राचीन भारत समजून घेणे’ हा भैरप्पा यांचा उद्देश होता, (पृष्ठ 31) हे त्यातच म्हटले आहे. आपल्या अध्ययन, चिंतन, संशोधन, प्रवास, चर्चा, सल्लामसलत यामुळे मला हे साध्य झाले. परिणामी व्यास भारताच्या चौकटीतच नवा भारत माझ्या मनात निर्माण झाले, (पृष्ठ 33) असे नमूद केले आहे. 
धैर्यशाली साहित्यिक : पर्वची काही वैशिष्ट्येच येथे उल्लेखिता येतील. त्याला कलात्मक, सृजनशीलता, सहजता - व्यावहारिकतेचे स्वरूप देण्यासाठी त्यांनी अपमिथकीकरण (डिमिस्टीफीकेशन अथवा डिमायथॉलायजेशन) आणि मनोवैज्ञानिक विश्‍लेषण या तंत्रांचा अवलंब केला आहे. याला पूरक आणि पोषक म्हणून प्रज्ञाप्रवाह पद्धती (स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस) आणि स्मरणतंत्र (मेमरी टेक्निक) यांचा वापर केला आहे. अपमिथकीकरण म्हणजे दैवत्व काढून टाकणे तसेच गौरवीकरणाच्या घटनांचे उच्चाटन होय. महाभारतातील सर्वात मुख्य पात्र असलेल्या कृष्णाचे देवत्व नाकारणे हे खर्‍या अर्थाने धैर्यवान साहित्यिकच करू शकेल, असे खूप मोठे धाडस आहे. कोणत्याही अलौकिक घटनेला वाव न देता कथावस्तू हाताळणे आवश्यक आहे. 
पंप यांनी आपल्या धार्मिक भूमिकेमुळे काही प्रसंगांना हात घातला नाही. पण शिशुपाल वधासारख्या घटना टाळल्या नाहीत. मात्र, भैरप्पा यांनी दैवत्व अथवा अलौकिक प्रसंगांना सरळ टाळले आहे. उदाहरणार्थ अक्षयवस्त्र प्रसंगात द्रौपदीचा संताप पाहून दुशासन माघार घेतो. वास्तवतेच्या आधारावर असे प्रसंग हाताळण्यासाठी भैरप्पा यांनी अक्षयवस्त्र प्रसंग टाळला आहे. विश्‍वरूप दर्शन प्रसंग आणि उत्तरेच्या गर्भरक्षणाचा प्रसंग याप्रमाणेच शिशुपाल, नरकासुर, जरासंध, सैंधव आदींच्या वधाचे प्रसंग यातून ठळकपणे जाणवते. 
कुठेही दैत्वाचा उल्लेखच नाही. कंस प्रकरणही अशा प्रकारे हाताळले आहे, की त्याने कौटुंबिक वादाचे रूप धारण केले आहे. त्याच्या क्रूरतेमागे हे कारण आहे. कृष्ण एक मित्र, चतुर राजकारणी, मुत्सद्दी, द्रष्टा नेता म्हणून साकारले आहे. 
युद्धानंतर धृतराष्ट्राच्या द्वेषाग्नीत भीमरुपी पुतळा नष्ट होतो, हे सांगण्याऐवजी, भीमाला मारण्यासाठी एक खंजीर लपवल्याचे जाणणारा कृष्ण धृतराष्ट्राची निर्भर्त्सना करतो, हे वास्तव चित्रण हे याचे उत्तम निदर्शक म्हणून पाहता येईल. असे अनेक प्रसंग ते दुसर्‍यांच्या आठवणी अथवा विधानाच्या रूपात मांडतात. मात्र, कथेचा प्रवाहीपणा, वाचनीयता याला कुठेही धक्का लागणार नाही, याची काळजी ते घेतात. उदाहरणार्थ, कीचक वधाचा प्रसंग पाहता येईल. याच प्रकारे भीम - दुर्योधन यांच्यातील शेवटच्या गदायुद्धाच्या प्रसंगाच्या निवारणामागची भैरप्पा यांची औचित्याची भूमिकाही आपल्याला चकित करते. वैशंपायन सरोवरातून बाहेर आलेल्या दुर्योधनाला पाहून भीम ‘हा आधीच मेला आहे. त्याच्याशी कसले युद्ध ?’ असे म्हणून निघून येतो. 
 पात्रांतील द्वंद्व : पंचपत्नीत्वासाठी कुंती द्रौपदीला राजी करते, ही कल्पना अनन्य आहे. मुलांना रागावण्यातच त्याचे समाधानही आहे, हे विशेष आहे. ‘माझ्यापोटी जन्माला आलेली मुले, एका रक्ताचे भाऊ एका मुलीच्या मोहात एकमेकांविरोधात उभे आहात. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. गप्प बसा. मी विचार करते.’ (पृष्ठ 124) पूर्वापार चालत आलेल्या नियोग पद्धतीविषयीही जेथे तेथे सुदीर्घ चर्चा दिसून येते. मनोवैज्ञानिकदृष्ट्या पात्रांमधील द्वंद्वाचे विश्‍लेषण हे पर्वचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. महाभारताची सर्व पात्रे त्यांच्या मनोविश्‍लेषणामध्ये गुंतली आहेत. याला उदाहरण म्हणून माद्री सती जाण्याचा प्रसंग पाहता येईल. भीमाचे विधान हे आणखी एक उदाहरण आहे. : बारा वर्षे वनवासात कंदमुळे खाऊन, एक वर्ष दुसर्‍यांच्या घरात काम केले. सुख अनुभवण्याची शक्ती असण्याचे वय संपल्यावर पुन्हा राजवाड्यात राहिले काय, वनात राहिले काय? दुर्योधन, दुशासन, कर्ण, शकुनीसह उर्वरित सर्व कौरवांना, त्यांना जन्म दिलेल्या आंधळ्याला मारणे, ही माझी एकच इच्छा आहे. मी जीवंत असताना... माझ्या पत्नीला जांघ दाखवलेल्या त्या सर्वांना ठार मारल्यावर शांत होईन. (पृष्ठ 80).  
पात्रचित्रणात व्यक्तीच्या स्वभावाची महानता, महत्त्व सांगण्यात भैरप्पा यांनी दाखवलेली संवेदनशीलता प्रशंसनीय आहे. मय निर्मित राजवाड्यात जमीन पाणी समजून, पाणी जमीन समजून मुखभंग झालेल्या दुर्योधनाला पाहून दौपदी हसली नाही, हे सांगताना ती राजघराण्याशी अनुरूप वागली नाही असा अर्थ होईल, हे भैरप्पा सांगतात. त्यामुळे कौरवेश्‍वराच्या सूडाला हेच मूळ कारण हे परिभाषित करणार्‍या सामान्य दृष्टिकोनाच्या पलीकडे ते गेल्याचे दिसते. निसर्गाचे वर्णन औचित्यपूर्ण आणि तेवढ्या थोडक्यात करणारे भैरप्पा हे निसर्गेतर वर्णनही अद्भुतपणे करू शकतात, यासाठी मत्स्ययंत्राचे वर्णन हे उत्तम उदाहरण आहे.  
युद्धभूमीचे चित्रण : दु:खद घटना, करूणरसाचा प्रसंग किती सहजपणे हाताळता येईल, यासाठी अभिमन्यू आणि घटोत्कच यांच्या मृत्यूनंतर अनुक्रमे सुभद्रा आणि भीमाच्या वेदनेचे वर्णन पाहता येईल. पर्वमध्ये जितक्या बीभत्सपणे युद्धाचे वर्णन आले आहे, तितके अन्य कोठेही आले नसल्याचे दिसते. इतस्तत: तुकडे होऊन पडलेले मृतदेह, ते खाण्यासाठी घिरट्या घालणार्‍या गिधाडांचे चित्कार, दुर्गंधी सहन होत नसल्याने दुसर्‍या मार्गाने रथ नेणारे सारथी अशा वर्णनांना आपल्या काळात झालेल्या जागतिक स्तरावरील आणि भारताच्या भूमीवर झालेल्या युद्धांच्या अहवालाचा आधार आहे. 
पर्व वाचून संपल्यावरही युद्धभूमीवरील दुर्गंधी आपल्याला विसरता येत नाही म्हणजे त्यात अतिशयोक्ती नाही. युद्धाचा वृत्तांत सांगणारा संजय दिव्यदृष्टी लाभलेला असला तरी घटनेनंतर वृत्तांत लिहिणार्‍या पत्रकारासारखे चित्रण झाले आहे, हे लक्ष वेधणारे आहे. युद्धानंतर अत्याचारांना बळी पडून परतलेल्या अनाथांना पंजाबच्या कुटुंबांनी स्वीकारले. नरकासुराच्या ताब्यात असलेल्या स्त्रियांना स्वीकारून कृष्ण पत्नीचे स्थान देतो, याचे चित्रण समकालीन घडामोडींना भैरप्पा प्राचीनतेच्या पटलावरही कसा प्रतिसाद देतात, याला साक्षी आहे. युद्धामुळे जनजीवनावर होणार्‍या भीषण परिणामाकडे लक्ष वेधणारे भैरप्पा धृतराष्ट्राच्या राजवाड्यात दिव्याला तेल नाही, जेवायला अन्न नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती, असे सांगतात. 
पर्वच्या मनोगतात भैरप्पा यांनी सांगितले आहे, ‘मी लिहिलेले महाभारताच्या पात्रांची कथा नाही; मानवी अनुभवाचे वेगवेगळे स्वरूप, रूप, मानवी संबंध, स्वरूप आणि विवेचन याची प्रज्ञा माझ्यात पहिल्यापासूनच होती. एकेक नवीन पात्र अथवा संदर्भ लिहिताना हे नवे आयाम सूचले. (पृष्ठ 10 - 11). समीक्षा करताना पर्वचे नवीन आयाम समोर येतात. पाश्‍चात्य महाकाव्यांचे मानदंड अथवा पौर्वात्य महाकाव्यांचे सिद्धांत यांच्या आधारावर ताडून पाहिल्यास पर्व आधुनिक गद्य महाकाव्य आहे, या सन्मानाला पात्र ठरणारे आहे. 
 डॉ. प्रधान गुरुदत्त, ज्येष्ठ कन्नड साहित्यिक 
साभार : दैनिक विजयवाणी 

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...