Friday 13 August 2021

लिंगायत, वीरशैव, हिंदू शब्दांच्या भोवती...



 डाॅ. एम. चिदानंद मूर्ती 

अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे 

अलिकडील दिवसांत लिंगायत आणि वीरशैव - लिंगायत स्वतंत्र धर्माचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.  लिंगायत धर्म बसवण्णांनी स्थापन केला आहे, बसवण्णा वीरशैव नव्हे तर लिंगायत आहेत, असे माते महादेवी काही वर्षांपासून सतत तीव्रपणे सांगत आहेत. त्यांचे मत खरे असल्याचे काही भक्तांना वाटते. मात्र, पुढील माहिती पाहा - 'माते महादेवी यांनी ५ एप्रिल १९६६ रोजी पूज्य लिंगानंद स्वामी यांच्याकडून जंगम दीक्षा घेतली. तेव्हा त्यांनी ' आदर्श जीवनासाठी, वीरशैव धर्मप्रचारासाठी सतत लढा देईन. शरण धर्म प्रचार करण्यासाठी परदेशात जाईन. मी आणखी जादा क्षमता प्राप्त करेन. नंतर वीरशैव मिशनरी बनेन', अशी प्रतिज्ञा केली. (लिंगायत वीरशैव : एंबुदू हौदु, हिंदूवू हौदु - डाॅ. महांतलिंग शिवाचार्य स्वामीजी, श्रीमद विभूतीपूर, वीर सिंहासन मठ, बेंगळुरू, रेणुक सौभाग्य सिरी ग्रंथ, पृष्ठ क्र. १४१). 

 माते महादेवी यांनी लिहिलेल्या 'मातृवाणी' पुस्तकात हा उल्लेख आहे -' दावणगेरे विश्वकल्याण मंटप स्थापक, धीर गुरुवर्य वैराग्यनिधी, वीरशैव धर्मपीदीप्ती... पूज्य श्री लिंगानंद स्वामीजी यांच्या चरणी... सच्चिदानंद सती प्रिय महादेवीचे अर्पण' (मातृवाणी, दावणगेरे १९६५) याच पुस्तकात 'वीरशैव लांछन (वीरशैवांचे प्रतीक)' नावाच्या लेखनात ही वाक्ये आहेत. - विभूती रुद्राक्षी धारणेय कंडु हीनैसी नगुवर | नोडेन्न मनदोळु सिग्गदु संचरिसिवे | त्रिपुंड्रवदु वीरशैवर विषय भस्मदा लांछन | रुद्राक्षीयदु लिंगपतीयक्षीयं होम्मी कट्टलट्ट मंगलसूत्र | इंथप्प विभूती रुद्राक्षी धरिसिद सद्भक्तरन कंडु | हीयाळीपर अडेतडेयिल्लद ज्ञानक्के मननोंदु नक्कनो सच्चिदानंद ( ವಿಭೂತಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ ಧಾರಣೆಯ ಕಂಡು ಹೀನೈಸಿ ನಗುವರ| ನೋಡೆನ್ನ ಮನದೊಳು ಸಿಗ್ಗದು ಸಂಚರಿಸಿವೆ| ತ್ರಿಪುಂಡ್ರವದು ವೀರಶೈವರ ವಿಷಯ ಭಸ್ಮದಾ ಲಾಂಛನ| ರುದ್ರಾಕ್ಷಿಯದು ಲಿಂಗಪತಿಯಕ್ಷಿಯಿಂ ಹೊಮ್ಮಿ ಕಟ್ಟಲ್ಪಟ್ಟ ಮಂಗಲಸೂತ್ರ| ಇಂಥಪ್ಪ ವಿಭೂತಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ ಧರಿಸಿದ ಸದ್ಭಕ್ತರಂ ಕಂಡು| ಹೀಯಾಳಿಪರ ಅಡೆತಡೆಯಿಲ್ಲದ ಜ್ಞಾನಕ್ಕೆ ಮನನೊಂದು ನಕ್ಕೆನೋ ಸಚ್ಚಿದಾನಂದ’ (ಮಾತೆ ಮಹಾದೇವಿ: ಮಾತೃವಾಣಿ ಪು. 42). ( विभूती, रुद्राक्ष धारण करणाऱ्यांना पाहून हीनतेने हसणाऱ्यांना पाहून मला संताप येतो. भस्माचे त्रिपुंड हे वीरशैवांचे प्रतीक आहे. रुद्राक्ष हे लिंग हेच पती समजून बांधलेले मंगळसूत्र आहे. अशा विभूती, रुद्राक्ष धारण करणाऱ्या सद्भक्तांना पाहून अविचाराने हीनतेने वागणाऱ्यांवर सच्चिदानंद हसेल. ( माते महादेवी - मातृवाणी पृष्ठ ४२). 



या पुस्तकासाठी ज्येष्ठ विद्वान डाॅ. एच. तिप्पेरुद्रस्वामी यांनी लिहिलेले अभिप्राय योग्यच आहे. माते महादेवी यांनी पूर्वी वापरलेला 'वीरशैव' शब्द सोडून आता 'लिंगायत' हा शब्द वापरला आहे. तसेच बसवण्णांनी  'लिंगायत' धर्माची स्थापना केली, हे त्यांचे सांगणे त्यांनी घेतलेल्या प्रतिज्ञेच्या विरुद्ध आहे.  वास्तविक बसवण्णांनी कोठेही 'लिंगायत' हा शब्द वापरला नाही. त्यांनी केवळ 'वीरशैव' हा शब्द वापरला आहे. उदाहरणार्थ - 'एन्न बंद भवंगळनु परिहरिसि... एन्न होंदिद शैव मार्गंगळ नेलेगळेदु निज वीरशैवाचारवरुही तोरी... शैव कर्मव कळेदु...' शैव असलेला मी चन्नबसवण्णांच्या सूचनेनुसार 'वीरशैव' झालो, असे बसवणांनीच सांगितले आहे  (वचन १०९८). त्यांनी ९३० व्या वचनात उल्लेख केलेल्या त्यांच्या पूर्वीच्या एका श्लोकात 'वीरशैव' शब्द आहे. इसवी सन १११० मधील केशिराजच्या 'शील महत्वद कंद' या पुस्तकात 'वीरशैव' शब्द आहे. त्यात अंगावर लिंग धारण करण्याची एक पद्धती  या अर्थाने  'लिंगायत' या शब्दाचा उल्लेख आला आहे. बसवण्णांनी कोठेही 'लिंगायत' या शब्दाचा वापर केला नाही. चित्र स्पष्ट आहे - 'वीरशैव' नावाचा धर्म बसवपूर्व कालीन आहे. - वर दिलेल्या आधारांनुसार हे स्पष्ट होते. याविषयी माते महादेवी काय सांगू इच्छितात ?

वीरशैव - लिंगायत हिंदू धर्माचा भाग नाही. तो एक स्वतंत्र धर्म आहे, असा निर्णय अखिल भारतीय वीरशैव महासभेने निर्णय  आहे. तसे मागणी पत्रही सरकारला दिले आहे. केंद्र सरकारने लिंगायत स्वतंत्र धर्म म्हणून मान्य केल्यास अल्पसंख्यकांना मिळणाऱ्या सर्व सोयी - सवलती लिंगायतांनाही मिळतील, ही आशा महासभेला आहे. हिंदू धर्म म्हणजे काय, त्याची व्याप्ती किती आहे, याची जाणीव महासभेला असू शकेल. स्वामी विवेकानंद, बाळ गंगाधर टिळक यांच्यासारख्या श्रेष्ठांनी आपण हिंदू म्हणूनच जाहीरपणे घोषित केले आहे. भारताच्या सर्वोच्या न्यायालयाच्या पूर्णपीठाने १९९५ मध्ये एका निर्णयात हिंदू धर्माची लक्षणे अशाप्रकारे स्पष्ट केली आहेत - ‘Acceptence of the Vedas with reverence, recognition of the fact that the means or ways to salvation are diverse; and realisation of the truth that the gods to be worshipped is large: that indeed is the distinguishing features of Hinduism’ - वेदांवर श्रद्धा ठेवणारे, बहुदेवता आराधक, दैव साक्षात्कारासाठी वेगवेगळे मार्ग आहेत, यावर विश्वास ठेवणार हिंदू आहेत. 



आतापर्यंत सर्व वीरशैव वेदांवर श्रद्धा ठेवणारे आहेत. 'ओंकार' (ओम) त्यांच्यासाठी प्रिय मंत्र आहे. काही देवांवर विश्वास ठेवणारे आहेत. कर्नाटकातील काही मठ  वेद - संस्कृत पाठशाळा चालवितात. उदाहरणार्थ  तुमकुरु येथील सिद्धगंगा मठाची संस्कृत वेद पाठशाळा होय. तेथे आजही सायंकाळची प्रार्थनासभा वेदघोषाने सुरू होते. लिंगायतांत शिव हाच परमदैव ही श्रद्धा असली तरी त्यातील काहीजण तिरुपतीच्या व्यंकटेश्वराचे भक्तही आहेत. हिंदूंप्रमाणेच वीरशैवही गायीला माता मानतात. - नंदी हे शिवाचे वाहन आहे. गावातील करियव्वा, काळव्वा आदी देवतांच्या पूजेतही सहभागी होतात. मात्र, तेथे चालणाऱ्या पशुबळीपासून दूर राहतात,  हे सहज आहे. 

बसवण्णांच्या वचनातील - (वेदक्के बरेयु कट्टुवे, शास्त्रक्के निगळवन्नुक्कुवे...)  अशाप्रकारच्या गोष्टी वेद विरोधी आहेत, हे सांगणे सत्याचा अपलाप करणारे आहे. ते  जातिभेद पाळत  इतर वर्गाच्या लोकांना हीन वागणूक देत वेदघोषात यज्ञयागादि करणाऱ्या ब्राह्मण वर्गाविरुद्ध आहे. त्याच बसवण्णांचे हे पुढील वचन लक्षवेधी आहे. - वेदागमगळ हेळिद हागे नडेवुदु, हेळिदंते नुडिवुदु, मीरी नडेयलागदु, मीरी नुडियलागदे मुक्तिपदवन्नैदुवात (वचन २३९). वेदांनी सांगितल्याप्रमाणे चालावे. त्यांनी सांगितलेले उल्लंघून चालणे शक्य नाही, हे त्यांचे स्पष्टातिस्पष्ट सांगणे आहे. 1१९५० मध्ये अस्तित्वात आलेल्या भारतीय संविधानानेही वीरशैव हा हिंदू धर्माचा भाग असल्याचे मान्य केले आहे. कायद्यानुसार वीरशैव, लिंगायत, हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी १९ व्या शतकात उदयास आलेले ब्रह्म, आर्य, प्रार्थना समाजाचे अनुयायी हे सर्वजण एकाच वर्गात मोडतात. बौद्ध, जैन, शीख समाजाचे अनुयायी हिंदू नसले तरी त्यांनाही हिंदू विवाह कायदाच लागू आहे.  कायद्यात वीरशैव, लिंगायतांना हिंदू धर्मापेक्षा वेगळ्या वर्गाचे समजणे हे कायदा करणाऱ्यांत असलेला वास्तवाचा अभाव होय. स्वत: बसवण्णांनीच मी वीरशैव म्हणून सांगितलेले असताना लिंगायत म्हणजे कोण ? बसवण्णांचे अनुयायी हे वीरशैवही होत, लिंगायतही होत. 


 

वीरशैव (लिंगायत) वर्ग हा हिंदू धर्माचा भाग नाही. तो स्वतंत्र धर्म म्हणून वरील कायद्यात दुरुस्ती होऊन लोकसभा, राज्यसभेत स्वीकारले जाणे आवश्यक आहे. सध्या ते शक्य न होणारी बाब आहे. कायद्यात सुधारणा करण्यासाठी कर्नाटक सरकारने केंद्राला पत्र लिहिले असले तरी ते लोकसभेत बहुमताने स्वीकारले जाणे असाध्य आहे.  तसेच पत्र लिहून विफल ठरल्यास ते मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाला आघातकारी ठरण्याची शक्यता आहे. सिद्धगंगेचे पूज्य शिवकुमार स्वामीजी यांनी म्हटले आहे - 'वीरशैव धर्म हिंदू धर्माचा अर्थात शैव धर्माची द्वैत, अद्धैत पंथांसारखी एक शाखा आहे...' ब्राह्मण जातीशी त्याची तुलना योग्य नाही. पूज्य पंचपीठाधिपतींचा अभिप्राय असा आहे - वीरशैव धर्म हिंदू धर्माचे आगम - वेद मानतो. आता वीरशैव हिंदू नाहीत, असे म्हणणे योग्य नाही. याच प्रकारे फ. गु. हळकट्टी, न्यायमूर्ती टी. एन. मल्लप्पा, कर्नाटक गांधी हर्डीकर मंजप्पा, सिद्धरामप्पा पावटे आदी मान्यवरांनी लिंगायत - वीरशैव हे हिंदूच आहेत, याविषयी सहमती व्यक्त केली आहे. 

लिंगायतांनी  (वीरशैव) आम्ही हिंदू नसल्याचे घोषित केल्यास वक्कलिग, बेडर, धनगर, भंगी, दलितही तशी घोषणा करतील  तेव्हा संपूर्ण भारतात कोणाची संख्या अधिक असेल?  क्रूरता, मतांधता, मतांतराने घेरलेल्या भारताचे भविष्य काय ? प्रज्ञावंतांनी याविषयी विचार करणे गरजेचे आहे.  मी जन्माने लिंगायत असलो तरी मला 'हिंदू' म्हणवून घ्यायला अभिमान वाटतो. 

(लेखक ज्येष्ठ संशोधक आहेत.)

साभार : विजयवाणी, शनिवार, दिन. ६ जानेवारी २०२८


Thursday 12 August 2021

मुस्लिमांच्या आक्रमणाला बळी पडलेली शरण क्षेत्रे

 डाॅ. एम. चिदानंद मूर्ती 

अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे 

हिंदूंसाठी पवित्र क्षेत्र असलेल्या  वाराणसी (काशी), अयोध्या (औध), नेपाळमधील काठमांडू आदी ठिकाणे मुस्लिमांनी विद्ध्वंस करुन अपवित्र केल्याची हजारो उदाहरणे आहेत. कर्नाटकातच हंपीसारख्या शेकडो ठिकाणी अशी कृत्ये केली आहेत. हा सर्वांना माहीत असलेला विषय आहे. मात्र, सर्वजण सार्वजनिकरीत्या  बोलायला कचरतात. त्याच प्रकारे  कर्नाटकातील वीरशैवांना पूज्य असलेली काही शरण क्षेत्रे आक्रमणाला बळी पडल्याचा विषय बहुतेकांना माहिती नाही. शरण क्षेत्रांना भेटी देऊन डाॅ. जयश्री दंडे व डाॅ. वीरण्णा दंडे  यांनी लिहिलेल्या १२ ने शतमानद शरण स्मारकगळू (बसव कल्याणदिंद कूडलसंगमदवरेगे ) १२ व्या शतकातील शरण स्मारके (बसव कल्याणपासून कूडलसंगमपर्यंत) या पुस्तकात ठिकठिकाणी चित्रांसह त्याची माहिती दिली आहे. त्यावर आधारित हे छोटेसे लेखन. 

१. परुषकट्टा : बीदर जिल्ह्यातील बसवकल्याण येथील परुषकट्टा नावाच्या ठिकाणी बसवण्णा हे गोरगरीबांना आर्थिक साहाय्य करायचे, अशी लोकांची धारणा आहे. परुषकट्टा आधी बसवेश्वर देवस्थानच्या अखत्यारीत होते. १९४८ मध्ये मुस्लिमांनी त्यावर दावा करत न्यायालयात धाव घेतली, त्यावर अद्याप निर्णय झाला नाही.  तेथे त्याच्या शेजारीच दररोज निरंतरपणे गोहत्या, पशुबळी, मांस विक्री  चालते. आधी परुषकट्ट्यावर मोठे दगडी मंटप होते, त्याचे कलात्मक खांब उखडून तेथेच टाकले आहेत. बसव कल्याणला गेलो असताना ती जागा पाहून मी तीव्र दु:ख अनुभवलो आहे. हे स्पष्ट आहे, की परुषकट्टा हे एक मूळ शरण क्षेत्र आहे. 




२. पीर पाशा बंगला : बसवकल्याणमधील बसवेश्वर देवालयाच्या मागे असलेला पीर पाशा बंगला हेही पूर्वी शैव क्षेत्र होते. तेथे असलेल्या नंदी मूर्तीवर हिरवे कापड टाकून झाकण्यात आले आहे. खाली कन्नड संख्या कोरल्या आहेत. तेथील मंटपही चालुक्य स्थापत्य शैलीची आहे. बहुतेक बाराव्या शतकातील आहे. तेथील मंटपाला लागूनच एक चालुक्यांचा शिलालेख आहे. 




३. बसवकल्याणच्या शेजारीच किल्ला असलेला डोंगर आहे. काही वर्षांपूर्वी  तेथील एका देवालयातील शिवलिंग काढून टाकले आहे. (माझ्या पाहणीनुसार किल्ल्याच्या दगडी भिंती बांधण्यासाठी भग्न देवालयाच्या अवशेषांचा वापर करण्यात आला आहे. चालुक्यकालीन देवालये पाडून त्यांचे अवशेष वापरले आहेत.)




४. बसव कल्याणनजीकच्या नारायणपुरात वचनकार वक्कलिग मुद्दय्याचे मंदिर आहे. तेच त्याचे समाधीस्थळ असल्याचा लोकांचा विश्वास आहे. त्याचे शिष्य मृत्यूंजय याचीही समाधीही तेथे आहे. मृत्यूंजयाचे देवालय अथवा समाधीला मुस्लिमांनी दर्गा बनविला आहे. मृत्यूंजय मंदिराचे मुर्तुजा दर्गा असे नामकरण झाले आहे. (मृत्यूंजय - मुर्तुजा). 

५. बसव कल्याण तालुक्यातील हुलसूरमध्ये वचनकार लद्वेय सोम याची समाधी आहे. तेथे देवालयाच्या मागे उमा महेश्वराचे भग्न शिल्प होते. निजामाच्या काळात रझाकारांनी नाश केलेल्या देवालयाचा ते भाग बनले आहे. 

६. बीदर तालुक्यातील अष्टुरमधील अल्लम प्रभू यांचे स्मारकाचेही  सुलतान अहमद शहावली बहामनी दर्ग्यात रुपांतर झाले आहे. तेथे परंपरेनुसार पूर्वीपासून हिंदू पूजा करतात. मुस्लिमांच्या ताब्यातील या दर्ग्यात मुस्लिम नमाज पठण करतात. (अशा ठिकाणांकडे हिंदू - मुस्लिमांची एकतेचे उदाहरण म्हणून पाहणे योग्य नाही. अशाप्रकारे समानतेची स्थळे म्हणून काही हिंदू अभिमान बाळगतात. मात्र, ही सर्व ठिकाणे मुस्लिमांनी बळकावलेली हिंदूंची पवित्र स्थाने आहेत.  )




७. सुरपूर तालुक्यातील मुदनूरू हे जेडर दासिमय्या यांचे गाव. पूर्वी हे गाव अग्रहार होते. तेथे १००१ लिंग, काही तीर्थ आहेत. ग्रामस्थ दासिमय्या यांचे जन्मस्थळ म्हणून एक घर दाखवितात. त्याचे आराध्य देव रामनाथ देवालयाच्या शेजारीच १०१ खांबांचे संगमनाथ मंदिर आहे. मुस्लिमांनी  ते सुंदर मंदिर तोडून जमेल तसे त्याला पाडून सुमारे २५० हून अधिक जणांनी घरे बांधली आहेत. 



८. सोलापूर जिल्ह्याती मंगळवेढा ही बिज्जळाची आधीची राजधानी होय.  बसवण्णांनी तेथे सुरुवातीला कोषाधिकारी म्हणून काम पाहिले होते. तेथील किल्ल्याजवळील एक दर्गाही मूळ हिंदू मंदिर आहे. त्या दर्ग्यालाही मुस्लिमांप्रमाणेच हिंदूही मानतात. स्थानिक लोकांच्या मतानुसार दर्गा पूर्वी मंगला देवीचे देवस्थान होते. दर्ग्यात आजही चालुक्य कालीन शिल्पे आहेत. (मंगला देवीच्या नावावरुनच त्या गावाला मंगळवाड, मंगळवेढे असे नाव पडले आहे.)

९. सोलापुरातील किल्ल्यात वचनकार सिद्धरामाने मल्लिकार्जुन मंदिर बांधले होते. तो किल्ला ताब्यात आल्यानंतर मुस्लिम शासकांनी त्याच्या स्थलांतराचा आदेश दिला. त्याचे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केले असले तरी मूळ देवस्थानचा काही भाग अजुनही शेष आहे. (टिपू सुलताननेही श्रीरंगपट्टण किल्ल्यातील अंजनेय देवस्थानचे मशिदीत रुपांतर केले.)



वर सांगितलेल्या पुस्तकातील आणखी काही माहिती. या हजार वर्षांत संपूर्ण कर्नाटकात मुस्लिम शासकांनी हिंदू देवालयांचा विद्ध्वंस केला आहे. विजापुरातील जिल्हाधिकारी बंगल्याच्या आवारातील करीमुद्दीन मशीद, कलबुर्गीतील कलाम मशीद, दोड्डबळळापूर येथील जिष्मा दर्गा, बेळगाव किल्ल्यातील मशीद, जामा मशीद या सर्व मशिदी हिंदू देवालयांच्या दगडांनी बांधण्यात आल्या आहेत. (संदर्भ : सीताराम गोयल लिखित ''Hindu Temples : What happened to them (The Islamic evidence. ) बाबा बुडनगिरी येथील दत्तात्रेय पीठाच्या विकृतीकरणाचा मुस्लिमांनी प्रयत्न केला आहे. विजापुरातील जगप्रसिद्ध इब्राहिम रोजा आवारात असलेले हिंदू देवालयाचे अवशेष मी पाहिलो आहे. त्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले. हंपीतील वीरण्णा मंदिरही होन्नारसाब दर्गा बनले आहे. हे थांबविण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे हिंदू समाजातील आंतरिक जागृती आणि दृढसंकल्प होय. भारतात, शेजारी आणि जगात काय घडते आहे, काय घडू शकते याविषयी जागरूक राहून भविष्याविषयी आंतरिक तळमळ असावी. आपले राष्ट्र, धर्म याविषयी खरा अभिमान त्यांच्यात निर्माण व्हायला हवा. सत्य सांगायला, त्यानुसार वागायला घाबरू नये. सहनशीलता ही प्रशंसनीय तर असहनशीलता अक्षम्य आहे. मात्र, अति सहनशीलता अक्षम्य आहे. हिंदूंमधील आजची सहनशीलता अशीच कायम राहिल्यासह पुढील शतकातील भारत अथवा इंडियातील अल्पसंख्यक हिंदूंना वरील सत्यता जाणवेल. मात्र, तेव्हा ते पूर्णपणे असहाय्य असतील. हीच परिस्थिती पुढे राहिल्यास हिंदू धर्म, भारतीय संस्कृती केवळ इतिहासाच्या अभ्यासाचा विषयवस्तू ठरण्याची वेळ येईल. ही माझी आंतरिक तळमळ, वेदना आणि सात्विक आक्रोशाची घोषणा आहे.  

साभार : कन्नड प्रभा 












सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...