Monday 3 February 2020

ज्ञानपीठासाठी भैरप्पा पात्र नाहीत का ?


ज्ञानपीठासाठी भैरप्पा पात्र नाहीत का ? हा प्रश्‍न अनेक वर्षांपासून केवळ कन्नड वाचकांना नव्हे तर त्यांना मानणार्‍या इतर भाषिक वाचकांनाही पडला आहे. तसेच यामागे काही कारणे असतील असे वाटणारेही आहेत. 
कदाचित भैरप्पा यांच्या जागी मीच असतो तर आतापर्यंत दुसर्‍यांदा ज्ञानपीठसाठी लॉबिंग केलो असतो की काय! कारण माझे साहित्यिक कार्य तेवढे आहे या अभिमानामुळे! 
होय, हा अभिमान आहे ना, तो सहज निर्माण होत नाही, तो कमवावा लागतो. एखाद्या वेळेस भैरप्पा यांच्यात तसा अभिमान असल्यास तो त्यांच्या ज्ञानामुळे मिळविलेला आहे,  सुखासुखी निर्माण झालेला नव्हे. सुखासुखी निर्माण होणारा अभिमान नव्हे, ती चरबी असते. 
ज्ञानामुळे निर्माण होणारा अभिमान मान्य होईल. एका मर्यादेत असल्यास तो गौरवास्पद असेल. असो, तो विचार बाजूला ठेवा. का इतक्या दीर्घ काळानंतरही भैरप्पा हे ज्ञानपीठ पुरस्कारासाठी पात्र ठरले नाहीत, हा प्रश्‍न माझ्यासारख्या अनेकांना खराच सतावत आहे. 
गोकाक, अनंतमूर्ती, कर्नाड, कंबार यांच्यासारख्यांना ज्ञानपीठ मिळाले. तर या सर्वांच्या रांगेत उभे राहण्याइतके साहित्याची सेवा भैरप्पा यांनी केली नाही का? ज्ञानपीठ हे साहित्य क्षेत्रासाठी आहे. केवळ साहित्य क्षेत्रासाठीच असलेल्या या पुरस्कारासाठी भैरप्पा हे पात्र ठरले नाहीत म्हणजे त्यांच्या साहित्य निर्मिती आणि सेवेविषयी माझ्यासारख्यात संशय निर्माण होतो. मात्र, सत्य हे आहे की, भैरप्पा यांची साहित्य रचना, सेवा आणि प्रतिभा नाकारणे कोणाकडूनही शक्य नाही. एखाद्या वेळेस नाकारल्यास वरील चारही साहित्यिकांच्या साहित्य रचना, सेवा आणि प्रतिभेला नाकारल्यासारखे होईल! 
सरळच सांगतोय, या गोष्टीचा कोणी चुकीचा अर्थ लावू नये. लॉबिंग न करता कोणताही पुरस्कार मिळवणे (हिसकावणे) साध्यच नसलेला हा काळ आहे. कर्नाड यांनी मी लॉबिंग करुनच ज्ञानपीठ मिळविल्याचे जाहीररीत्या कबुल केले होते. मला ज्ञानपीठ मिळाले तेव्हा ते विजय तेंडुलकर यांना मिळायला हवे होते, असे त्यांनीच म्हटले होते! आतापर्यंत देण्यात आलेले सर्वाधिक पुरस्कार आणि पुरस्कार विजेते (सर्वच नव्हेत) यांनी लॉबिंग करुनच मिळविलेले आहे, हा भाव लोकांत आहे. 
जिल्हा, राज्योत्सव पुरस्कारासाठीच लॉबिंग चालते म्हटल्यावर आणखी ज्ञानपीठ, पद्म पुरस्कारांसाठीही लॉबिंग चालत नाही म्हणायचे तर यावर विश्‍वास ठेवणे खूपच कष्टदायक आहे !
हा लॉबिंगचा काळ आहे. पुरस्कारच नव्हे तर प्रत्येक गोष्टीला लॉबिंग केल्याशिवाय अथवा करायला लावल्याशिवाय काहीही मिळत नाही. भैरप्पा यांनी लॉबिंग न केल्याने त्यांना ज्ञानपीठ मिळाले नाही. लॉबिंग केल्यास कधीच ज्ञानपीठ मिळाले असते, अशी साहित्य वर्तुळात चर्चा आहे. वाचकांच्या वर्तुळातही हीच चर्चा आहे. त्यांना अजून का ज्ञानपीठ मिळाले नाही, त्यांच्याशिवाय इतरांना मिळाले तरी ते मिळाल्यासारखे नाही, असा अतिरेकी विचारही मी ऐकलो आहे. अरे, भैरप्पा लॉबिंग केले असते तर मिळाले असते, असे व्यंगात्मक बोलणेही ऐकले आहे. 
मात्र, भैरप्पा यांचा गुणस्वभाव माहीत असलेले कोणीही त्यांनी पुरस्कारासाठी लॉबिंग करतील हा विचार सोडा, अशा संधीसाधू राजकारणात ते उतरतील हा विचारही करणे साध्य नाही. देहि हा त्यांचा स्वभाव नाही. तशी अभिरुचीही त्यांची नाही. मंगळुरू लिट. फेस्टमध्ये त्यांना दिलेला गौरव निधी त्यांनी कल्लड्क श्रीराम माध्यमिक शाळेला दिला. सरस्वती सन्मान प्राप्त भैरप्पा यांना कोणत्याही कारणासाठी, कोणत्याही परिस्थितीत लॉबिंग करण्याची दुस्थिती येणार नाही, असे माझ्यासारख्याला वाटते. आता तर मोदी सरकार आहे. लॉबिंग करायचेच तर त्यांना वाटेल ते पद मिळविण्यास अनुकूलता आहे. 
सत्ताधार्‍यांची खुशमस्करी करुन पद, पदवी, पुरस्कार मिळविणे हे एका रीतीने बौद्धिक आणि वैचारिक गुलामीच आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, बौद्धिकदृष्ट्या उजव्या विचारसरणीचे म्हणूनच भैरप्पा यांची गणना केली गेली आहे. अथवा तसेच त्यांच्याकडे पाहिले गेले आहे. हे चुकीचे आहे. कादंबर्‍या पाहून, त्यातच आवरण कादंबरी वाचून त्यांना तसे समजणे चुकीचे आहे! आणखी त्यांचे सामाजिक विचार पाहून त्यांना तसे समजणे बौद्धिक दारिद्य्रच होय! 
भैरप्पा यांना चिकटलेले विवाद म्हणजे 1. त्यांनी त्यांच्या कादंबर्‍या लेखनासाठी निवडलेले विषय. 2. त्यांच्या काही प्रमुख कृती (वंशवृक्ष, तब्बलियू निनादे मगने, पर्व, सार्थ, आवरण, उत्तरकांड). यात भारताच्या पुरातन संस्कृतीचे सार आहे. त्यामुळे ते काही साहित्यिकांमुळे, विशेषकरुन नवसाहित्यिकांच्या टिकेचे लक्ष्य बनले. 3. वाद्यांवर राष्ट्रगीत वाजवल्याच्या प्रकरणात इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांचे समर्थन केले. 4. कावेरी विवादाच्या निषेधाला हिंसक वळण लागले. हिंसा, निषेधामुळे काही साध्य होणार नसल्याचे नारायण मूर्ती यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्यामुळे. 5. टिपू सुलतान धर्म सहिष्णू असल्याचे वक्तव्य गिरीश कर्नाड यांनी केले होते. भैरप्पा यांनी दैनिक विजय कर्नाटकमधून त्याचे खंडन केले. कर्नाड हे टिपू सुलतान याच्याविषयी चुकीचे विचार पसरवत आहेत. विनाकारण धर्म सहिष्णू म्हणून त्याच्या व्यक्तिमत्वाचे उदात्तीकरण करत आहेत. टिपू सुलतान एक धर्मांध होता. तो हिंदूंचा द्वेष करत होता हे सांगितले. 6. अनंतमूर्ती हे भैरप्पा यांच्या कादंबर्‍यांचे प्रमुख टीकाकार होते. भैरप्पा यांनी आपल्या आणि अनंतमूर्ती यांच्यातील वाद - विवाद भित्ती आणि नानेके बरेयुत्तेने या कृतींच्या काही भागात उल्लेख केला. 7. मुस्लिम राजवटीतील भारतीय संस्कृती आणि सामाजिक प्रगतीवर झालेला परिणाम दाखविणारा, ऐतिहासिक सत्यावर आधारित आवरण लिहिले. 8. भैरप्पा हे इतिहासाच्या नावाखाली समाजात दुही माजवून राज्य करू इच्छिणारे मूलतत्ववादी आहेत. तसेच त्यांना कादंबरी लिहिण्याचे ज्ञान नाही, असे वक्तव्य अनंतमूर्ती यांनी केले. त्यामुळे त्यांना साहित्य क्षेत्रात टिकेला सामोरे जावे लागले. 9. मात्र, भैरप्पा यांनी आपण कोणत्याही विषयी पूर्वग्रह न ठेवता केलेल्या सत्यान्वेषणाचे आवरण हे फळ असल्याचे सांगत बाजू मांडली. टीकाकारांनी कोणत्याही निर्णयाला येण्यापूर्वी कादंबरीत उल्लेख केलेल्या संदर्भ ग्रंथांचे अध्ययन करावे असे सांगितले. 10. दैनिक विजय कर्नाटकात प्रसिद्ध झालेल्या भैरप्पा यांच्या मतांतर मत्तु कवलु लेखनावर खूप दिवस समर्थनार्थ आणि विरोधात चर्चा चालली, लेख प्रसिद्ध झाले. 11. कवलु कादंबरी खूपच चर्चेचा, विवादाचा विषय ठरली. आधुनिक महिला सिद्धांतातील फोलपणा आणि त्याचा सामाजिक परिणाम हाच वस्तूविषय निवडून ही कादंबरी लिहिली. त्यामुळे महिला प्रगती विरोधी हा शिक्का त्यांच्या माथ्यावर मारला गेला. सारा अबुबकर यांनी ती कादंबरी कोणी वाचू नये, असे एका समारंभात जाहीररीत्या सांगितले. 
मुख्यत: भैरप्पा हे उजव्या विचारसरणीचे आहेत, हा जुना आरोप या अकरा कारणांमुळे त्यांना ज्ञानपीठ मिळाले नाही, ही विवादात्मक चर्चा चालत आली आहे. 
ज्ञानपीठ पुरस्कारासाठी साहित्यकृतींच्या निवडीचा विचार पाहू. 18 भारतीय भाषांतील अमूल्य कृतींचे प्रतिष्ठानची निवड समिती परिशीलन करते. पुरस्कारासाठी निवडली जाणारी व्यक्ती प्रतिभावंत, प्रतिष्ठित आणि सृजनशील साहित्यिक असावी. साहित्य क्षेत्रात विविध प्रकारची साहित्य निर्मिती करुन यशस्वी झालेली असावी. 18 भाषांत अत्युन्नत स्थान प्राप्त केले तरच ज्ञानपीठ पुरस्कारासाठी कृती निर्मात्याची निवड होते. ज्ञानपीठ पुरस्कारामुळे त्या साहित्यिकासह त्याने निर्मिलेल्या साहित्याची भाषा आणि त्याच्या प्रांतालाही सन्मान प्राप्त होतो. 
ज्ञानपीठ पुरस्काराठीचे नियम सूची म्हणजे 1. साहित्यिक आणि कृती भारतीयच असावी. 2. त्याने आपल्या संबंधित भाषेत पंडित, तज्ज्ञ असावा. 3. पुरस्कार देताना ती व्यक्ती जीवंत असावी. 4. एकदा पुरस्कार दिलेल्या व्यक्तीला कोणत्याही कारणांनी पुन्हा पुरस्कार देऊ नये. 4. एकदा कोणत्याही एका भाषेला पुरस्कार दिल्यास त्यानंतर तीन वर्षांपर्यंत त्याच भाषेच्या कोणत्याही साहित्यिकाला हा पुरस्कार देऊ नये. देशात आतापर्यंत 18 भाषांना दिलेल्या ज्ञानपीठ पुरस्कारांत हिंदी भाषेनंतर सर्वाधिक पुरस्कार कन्नड भाषेला मिळाले आहेत. त्यामुळे कन्नड भाषेचा मान आणि सन्मान उंचावला आहे.
ज्ञानपीठाच्या नियमांनुसार भैरप्पा हे त्यासाठी पूर्णपणे पात्र आहेत. केवळ नियमांचे अवलोकन करुन त्यानुसार भैरप्पा हे त्यासाठी पात्र आहेत, असे मला वाटत नाही, वाटूही नये. भारतातील साहित्याला दिल्या जाणार्‍या श्रेष्ठ पुरस्कारासाठी श्री. साहू शांतिप्रसाद जैन दांपत्याने या भारतीय प्रतिषठानाची स्थापना केली. साहजिकच जैन तत्त्वज्ञानालाही हे प्रतिष्ठान पुरस्कार देत आला आहे. जे साहित्य मानवी जीवनातील संवेदनशीलता आणि संवेदना अभिव्यक्त करते अथवा चैतन्य भरते असे साहित्य सर्वमान्यता, सार्वकालिक मौल्यवान ठरते. भारतीय साहित्यात चिरस्थायी बनते. ज्ञानपीठ मिळविलेले आतापर्यंतचे साहित्यिक आणि साहित्याचे अवलोकन केल्यास हे अधिक ग्राह्य ठरते. 
मानवजात ही एकच आहे, यावर पंप यांनी भर दिला. पंप, रन्न, पोन्न, नागचंद्र आदी जैन साहित्यिकांपासून दासांपर्यंतच्या साहित्यामुळे संपन्न बनलेली कन्नड साहित्य परंपरा देशी भाषांत अभिन्न आहे. वैशिष्ट्यांचा आगर आहे. जी साहित्यकृती समाजाच्या हितासाठी जीवनमूल्यांचे संवर्धन करते ती सार्वकालिक सत्य बनून राहते. भैरप्पांच्या कृतींचे हे मूलस्त्रोत होय. जे साहित्य सकल जीवनिष्ठेने जीवनमूल्यांचे प्रतिनिधीत्व करते ते समाज स्वीकारते, स्वीकारायलाही हवे. भैरप्पांच्या कादंबर्‍यांची ही खरी अस्मिता आहे. अशा प्रकारच्या अगाध अनुभव चिंतनेने त्यांच्या कादंबर्‍यांतील मुख्य पात्रे उलगडतात.    
कारंत यांच्या मूकज्जीय कनसुमधील मुकी आजी ही बोलता न येणारी मुकी म्हातारी नव्हे. 80 वर्षांची एक मौनी म्हातारी आहे. वर्षानुवर्षे विशाल प्रांगणातील एका अश्‍वत्थ वृक्षाखाली बसून एक महिला वेदना सहन करत मानवी विषमता उलगडून सांगते. सिंहावलोकन करत, मनातच विचार करत आपल्यात एक अद्भुत जागृती निर्माण करताना दिसते. समष्टीच्या धर्तीवर भूतकाळाचा वर्तमानकाळाशी सांगड घालत मानवी सभ्यतेच्या विकासाचा तिचा प्रयत्न रोमांचक आहे. करुणा ही जीवनातील सर्वात मोठी शक्ती आणि मनुष्यत्वाचे अत्यंत मोठे गुण ती शिकवते. भैरप्पांच्या कादंबर्‍यांत अशा पात्रांची मालिकाच आहे. कसे तरी लाभलेले हे जीवन कसेही जगले तरी तरी चालेल, अशा प्रकारचे मानवी जीवन नाही, अशी मूल्ये कारंतांच्या मूकज्जीसारखी पात्रे सांगतात. अशी पात्रे भैरप्पांच्या कादंबर्‍यांतही दिसतात. या कारणांमुळे भैरप्पा यांच्या कादंबर्‍या वाचताना अनेक संदर्भात कारंत यांच्या सर्जनशील आणि प्रतिभावान सामर्थ्याची आठवण होते.  दोघांचीही चिंतन शक्ती आणि जीवन अंतर्दृष्टी एकच वाटते. कारंतांप्रमाणे भैरप्पा यांनी निवडलेली कथावस्तू, तंत्र, भाषा आणि निरुपण शैली यामुळे त्यांच्या कादंबर्‍या चैतन्यप्रद ठरतात. त्याची व्याप्ती विस्तृत आहे. तसेच कादंबरी आपले लक्ष्य गाठत जिंकते. हवे ते साध्य करते. 
भैरप्पा यांच्या साहित्य रचनेची व्याप्ती खूप मोठी आहे. वास्तवतेची चौकट मोडून काल्पनिक चौकटीत त्यांनी कोणतीही कादंबरी लिहिलेली नाही, लिहिणारही नाहीत. कथेनुसार निर्माण केलेली पात्रे काल्पनिक असतात, ही साहित्यातील सहज क्रिया आहे, हा वेगळा विषय आहे. त्याला कधीही कोणी अपवाद नाही. कादंबर्‍यांची सुरुवातच वास्वतेच्या पार्श्‍वभूमीवर झालेली आहे. भैरप्पा हे भ्रम निर्माण न करता वास्तवतेच्या आधारावर संशोधन करुन लिहिणार्‍या संशोधकांच्या रांगेतील साहित्यिक आहेत. केवळ जे स्वत:वर मात करू शकतात तेच कठोर विचार मांडणे असो, चिंतन करणे असो अथवा लिहिणे शक्य आहे. वेद आणि उपनिषद हे देशाच्या संपूर्ण संस्कृतीचे मूळ आहेत. - असे सांगणारे साहित्यिक भैरप्पा पुराण भंजन करुन, वास्तव जीवनाचा शोध घेतल्यानेच पर्व, उत्तरकांड यासारख्या सृजनात्मक कृतींची निर्मिती त्यांच्याकडून झाली असेल! ‘
"Literature is a way of discovering human truths in its emotional and aspirational aspects. साहित्यिकाने या समाजाला कोणती जीवनमूल्ये द्यावीत, हे त्यांनी सांगितले आहे. : No one asks how Draupadi must have felt having five husbands, Or which one she might haved loved more. In Parva I tried to change the motivation for Gandhari about why she wears a patch around her eye. In Uttarakhanda , I reinterpreted the Ramayana from Sita's point of view"
एका सर्जनशील लेखकाच्या कादंबरीतील पात्रे एका जीवंत जीवनाच्या निरंतर यानाप्रमाणे मूल्यांचे विस्ताराने, विस्तीर्णपणे प्रतिपादन करतात !
  शेवटची गोष्ट : भैरप्पा यांना ज्ञानपीठ देऊच नये, मिळूच नये यासाठी ऊर फाटेस्तोवर प्रयत्न करणारेही आहेत. पूर्वग्रह वगळता दुसर्‍या कोणत्याही कोनातून अशा गोष्टींचे समर्थन करणे शक्य नाही. भैरप्पा यांचे साहित्य न वाचताच केलेल्या या कोरड्या गोष्टी आहेत. मागे एकदा भैरप्पा यांना मरणोत्तर ज्ञानपीठ द्या, अशी मागणी करण्यात आली होती. अशी असभ्य संस्कृतीहीन वक्तव्ये करणारी मंडळीही आहेत. अशा प्रकारची भाषा करणार्‍यांत बहुतांश कन्नड भाषिकच आहेत, हे खेदजनक आहे. 
भैरप्पा यांच्या साहित्य विचारांचे समर्थन करणार्‍या एका ज्येष्ठ व्यक्तीला चप्पल दाखवणारे महाभागही आहेत. कोणाला कधी पुरस्कार द्यावा अथवा मिळावा, हा विचार मांडण्यासाठी कोणताही पुरस्कार कोणाच्याही मालकीची संपत्ती नाही, ती त्यांची मालमत्ताही नाही. भारतीय ज्ञानपीठाचे मोठेपण आणि गौरव खूप मोठे आहे. प्रतिष्ठानच्या कार्यक्षेत्राची व्याप्तीही खुप व्यापक आहे. भारतीय साहित्य विश्‍वात भारतियांना दिला जाणारा हा श्रेष्ठ पुरस्कार भारतीय साहित्य जगतात आपल्या लेखनाने जनमान्यता मिळविलेल्या भैरप्पा यांना मिळायलाच हवा. ते त्याला पात्र आहेत. भारतीय ज्ञानपीठ नावाच्या शुद्ध सरोवरातील पुष्करणीतील अनेक कमळांच्या रांगेत भैरप्पा नावाचा कमळही फुलायला हवा, ही साहित्यप्रेमींची खूप दिवसांपासूनची इच्छा आहे. निवड समितीत प्रत्येक भाषेचे दोन, तीन प्रतिनिधी असतात. त्यातील कन्नड भाषेच्या प्रतिनिधींनी भैरप्पा यांच्या कन्नड साहित्य सेवेची गहनता समितीपुढे विषद करुन सांगायला हवे. तसेच त्यांच्याकडे मागणी करुन भैरप्पा यांच्या माध्यमातून कन्नड भाषेला नववे ज्ञानपीठ मिळेल, यासाठी प्रयत्न करायला हवेत.  
टी. देविदास

No comments:

Post a Comment

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...