अमृत सुरभी

Monday, 12 August 2019

सिद्धगंगेचा लोकजंगम






बाराव्या शतकात दासोह शब्दाला बसवण्णांनी क्रियाशील रुप दिले. त्यांच्यानंतरच्या अनेक अनुयायांनी ही परंपरा पुढे चालवल्याचे दाखले इतिहासात मिळत असले तरी आपल्याला त्याचा अर्थ समजून घेण्याचा, पाहण्याचा योग शरण परंपरेतील सिद्धगंगा मठाने दिला.  तर पद्मभूषण डाॅ. शिवकुमार स्वामी यांनी कर्म, भक्ती, ज्ञान या योगत्रयांच्या बळावर आणि अन्न, अक्षर, आश्रय या त्रिविध दासोहाच्या आधारे या मठाला कर्नाटकातच नव्हे तर देशभरात गौरवाचे स्थान मिळवून दिले. त्यामुळे ते चालता बोलता ईश्वर (नडेदाडुव देवरू) बनले.  अशा शतायुषयी स्वामीजींचे २१ जानेवारी रोजी वयाच्या १११ व्या वर्षी निधन झाले. … 
 भगवी कफनी घातलेला जंगम असे का? 
कर्णकुंडल , हस्तमुद्रिका बाळगलेला जंगम असे का? 
केवळ संन्यासी सारे जंगम असती का? 
वेषधरी सारे जंगम असती का?
अज्ञानी सारे जंगम असती का? 
भूभारी  सारे जंगम? नव्हेत. 
जंगम कोण म्हणजे, 
सीमा नसलेला निस्सीम हा जंगम, 
आशा नसलेला निरासक्त हा जंगम, 
चिंता नसलेला निश्चिंत हा जंगम, 
अशा जंगमाची चाहूल न लागल्याने, 
कूडल चेन्नसंगय्या स्वत:च जंगम झाला. 
श्री चेन्नबसवण्णांनी या वचनात सांगितलेल्या जंगमाच्या लक्षणाप्रमाणे पद्मभूषण डाॅ. शिवकुमार स्वामी हे निस्सीम, निरासक्त आणि निश्चिंत होते. ८८ वर्षांचे संन्यस्त जीवन, ७७ वर्षे मठाधीश म्हणून कायक निर्वाह हे संख्यात्मकदृष्ट्या आश्यर्चकारक आहे. मात्र, यापेक्षा अधिक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे त्यांचा निकटचा लोकसंपर्क. त्यांच्या दृष्टीने संन्यास हा समाजापासून अंतर आणि धार्मिक गोष्टींपुरते सीमित नव्हते. मनुष्याची आंतरिक उन्नती हाच त्यांच्या चिंतनाचा प्राधान्याचा विषय होता. त्यासाठी सशक्त व्यक्तित्व घडवणारे शिक्षण गोरगरीब आणि वंचित समूहांना मिळवून देण्यासाठी आजीवन ते राबले.

अनपेक्षितपणे सिद्धगंगा मठाचा उत्तराधिकारी झालेला शिवण्णा शिवकुमार स्वामी झाला. मात्र, त्यांनी आपल्या वैराग्यभाव, संयमी, दृढसंकल्प, कार्यदक्षता, वाकपटुत्व, संस्कृत, कन्नड व इंग्रजी भाषांवरील प्रभुत्व, सेवाकांक्षा आणि बसवादि शिवशरणांनी प्रतिपादित कायक व दासोह तत्त्वांच्या आचरणाने मठाला लौकिक प्राप्त करुन दिले. १९३० मध्ये श्री मरुळाराध्य स्वामी यांच्या निधनानंतर श्री उद्दान शिवयोगी यांनी मठाचे उत्तराधिकारी म्हणून त्यांची निवड केली. शिवण्णा बंगळुरुत पदवीचे शिक्षण घेत होता.   मठाधिपती मरुळाराध्य स्वामी यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी तो मठात आला होता. ते संपल्यांतर श्री उद्दान शिवयोगी यांनी त्याला जवळ बोलावले, म्हणाले, तुला एक गोष्ट सांगतो. तू नकार देऊ नकोस. आता तूच या मठाचा उत्तराधिकारी. हे शिवण्णासाठी अनपेक्षित होते. तरीही त्याने क्षणाचाही विचार न करता  होकार दिला. तारुण्यात अनेक आमिषे हात जोडून समोर उभ्या असतात. भविष्याची स्वप्ने असतात. तशी त्यांचीही असतील आणि त्यांच्या वडिलांसह कुटुंबियांनीही पाहिल्या असतील. मात्र, त्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करतात त्याने भगव्या वस्त्रातील संन्यस्त जीवनाचा हा कंटकाकीर्ण मार्ग स्वीकारला.   १९४१ मध्ये मठाची सूत्रे त्यांच्या हाती आली तेव्हा ६० विद्यार्थ्यांची संस्कृत पाठशाळा आणि छोटेसे वसतिगृह होते.  तेथे आज १३१ शैक्षणिक संस्थांतून ४९ हजार १४७ विद्यार्थ्यांची ज्ञानाची भूक भागवली जात आहे.  तर अभियांत्रिकी महाविद्यालयाने देशातच 'एसआयटी' या नावाने ख्याती मिळवली आहे.  सरकार शिक्षणाला अधिक महत्व देत नसतानाच्या काळात मठाने त्याचे महत्व ओळखले. योग्य शिक्षण, वसतिगृह आणि भोजन याद्वारे हजारो मुलांचे जीवन उजळवले. 'ज्ञान हाच दीपस्तंभ' हा शिवकुमार स्वामी यांचा विचार होता. त्यांच्या शब्दांत सांगायचे तर 'शिक्षण हे व्यक्ती व राष्ट्र या दोहोंसाठी सशक्तीकरणाचे माध्यम आहे. कारण आपल्या देशाचे भवितव्य त्यांच्या हाती सुरक्षित राहू शकेल. योग्य आणि चांगले शिक्षण हे एक असे माध्यम आहे जे मनुष्याला शक्तिसंपन्न बनवते. तसेच त्याला समाजातील वाईट गोष्टींपासून मुक्त ठेवते.’  विशेष म्हणजे १० हजार विद्यार्थ्यांच्या निवास, भोजनाची आणि रोज दर्शनासाठी येणाऱ्या तीन हजारांहून अधिक भाविकांच्या भोजनाची व्यवस्था केली जाते.  मठातील अनेक दशकांपूर्वीची पेटती चूल आजही गोरगरीब, अनाथ विद्यार्थ्यांसह भाविकांसाठी नंदादीप बनली आहे. 'जेवणारा यजमान, वाढणारा दास' असे शिवकुमार स्वामी म्हणायचे. त्यामुळेच रात्रीही मठात आलेला भाविक उपाशीपोटी गेल्याचे आजपर्यंत एकही उदाहरण नाही. त्यांनी त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था लावली होती. मठासाठी रोज लागणारे धनधान्य पाहिल्यास थक्क करणारे आहे. रोज तीन टन तांदूळ, दीड टन रागी पीठ, तीन क्विंटल तूरडाळ, ४ क्विंटल भाजीपाला, तीन क्विंटल कांदा, २०० नारळ आदी अन्य वस्तू लागतात. हजारो विद्यार्थ्यांच्या भोजन आणि भाविकांच्या प्रसादाची सोय करणाऱ्या या मठाच्या स्वामीजींचे आहार होते केवळ दोन इडली, एक लहान रागी मुद्दी आणि कुडनिंबाचा काढा!

शिवकुमार स्वामी यांनी बसवण्णांचा कायकवे कैलास हे तत्व जीवनात प्रत्यक्षात आणले. त्यांच्यावर बसवण्णांसह स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव होता. गरीब, दुबळे, रोगी वैगरेंमध्ये ज्यांना शिव दिसतो, ते खरेखुरे शिवाचे उपासक होत. तेच खरोखर शिवाची उपासना करीत असतात आणि जो माणूस केवळ प्रतिमेमध्येच शिवाची उपासना करीत असतो, त्याने धर्मजीवनाला नुकतीच सुरुवात केली आहे, असे म्हणता येईल, फक्त मंदिरांमध्येच शिव आहे, असे मानणाऱ्या व्यक्तीपेक्षा जी व्यक्ती जात किंवा धर्म विचारात न घेता , एका देखील गरीब माणसाची शिव बोधाने सेवा करते तिच्यावर शिव अधिक प्रसन होतात, हा विवेकानंदांचा विचार त्यांनी अनुसरला. ते रोज वि्दयार्थ्यांना नीतिकथा सांगायचे. त्यात बसवण्णा, विवेकानंद आणि महात्मा गांधी यांच्या संदर्भातील कथा सर्वाधिक असायच्या. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबन, शिक्षणाबरोबर जीवनशिक्षणाचेही धडे दिले. त्यांच्यावर श्रमसंस्कार केला.  त्यांच्यासोबत मठात आणि शेतात राबणारे ते कायकयोगी होते.  त्यांच्यात धर्म आणि कर्म यांचा समन्वय होता. त्यामुळेच राष्ट्रकवी जी. एस. शिवरुद्रप्पा, ज्येष्ठ साहित्यिक जी. एस. सिद्धलिंगय्या, गो. रु. चन्नबसप्पा, कुं. वीरभद्रप्पा आदी अनेकविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मठाच्या शिक्षण संस्थांतून घडली. श्री शिवकुमार स्वामी यांनी बसवण्णांच्या विचारांच्या प्रसारासाठी कार्य केले. तसेच शेती विकासासाठी कृषी, जनावरे प्रदर्शनासह विविध उपक्रम राबवले. मठाची वार्षिक यात्रा ही रयत यात्रा म्हणूनच ओळखली जाते. त्यांनी आध्यात्मिक जागृती, सांस्कृतिक परंपरेचे रक्षण, संस्कृतचे पुनरुज्जीवनही केले. 

स्त्रियांविषयी शिवकुमार स्वामी म्हणतात, स्त्री ही कुटुंबाचे नेत्र आहे. ती चांगली राहून आपल्या मुलांना चांगले घडवली तर ते कुटुंब चांगले बनेल. एकेक कुटुंब चांगले बनले तर समाज चांगले बनायला किती वेळ लागेल ? एकदा काही मुली ट्रेकिंगसाठी सिद्धगंगा डोंगराव गेली होती. प्रसादाच्या वेळेस त्या सिद्धगंगा मठात गेल्या. पसाद भवनाच्या दारात त्या थांबल्या. आपण प्रसादाला स्वतंत्र रांगेत बसावे का, हे विचारण्यासाठीत्या थांबल्या होत्या. तितक्यात तेथे आलेल्या श्री शिवकुमार स्वामीजींचे त्यांच्याकडे लक्ष गेले. ते बाहेर का थांबले आहेत, याविष्यी त्यांनी त्यांना विचारणा केली. त्यावर एका मुलीने सांगितले, पाळीचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे आम्ही स्वतंत्र रांगेत बसावे का, विचारण्यासाठी थांबलो आहोत. त्यावर स्वामीजी खिन्नतेने म्हणाले,  ही एक नैसर्गिक दैहिक प्रक्रिया आहे. यात संकोचण्यासारखे काय आहे. चला त्याच रांगेत बसा, असे सांगितले. तसेच म्हणाले, आई होण्याचे सौभाग्य प्रत्येकाला मिळत नाही. स्त्रियांनाच स्त्रियांच्या देहाविषयी सन्मानाची भावना हवी. निसर्गप्रेरित दैहिक प्रक्रियेविषयी संकोच नसावा.  नारीकुलच देव आहे, असा शिवशरणांनी उद्घोष केला. बसवेश्‍वरांसह शरणांनी स्त्रियांना समान संधी प्राप्त करुन दिली. त्यामुळे शिवशरणींनी अनुभव मंटपाच्या चर्चेत भाग घेतानाच वचनांची रचना केली. जिला पाहिल्यानंतर माझे मन आकर्षित होईल त्या     परवधूला महादेवी मानेन! तसेच लिंग - जंगम एकच मानल्यानंतर स्त्रिया पार्वतीसमान आहेत, असा विचार बसवेश्वरांनी मांडला. ही परंपराच शिवकुमार स्वामी यांनी पुढे चालवली. 


चौकट 
धर्मनिरपेक्ष धोरणामुळे बनले सर्वांचे श्रद्धाकेंद्र 
सिद्धगंगा मठ वीरशैव लिंगायत समुदायाचे असले तरी श्री शिवकुमार स्वामी यांच्या धर्मनिरपेक्ष धोरणामुळेच ते सर्व वर्गातल्या भक्तांचे श्रद्धाकेंद्र बनले. शैक्षणिक संस्थांत येणाऱ्या विद्यार्थी आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांत त्यांनी कोणताही भेद केला नाही.  कन्नडद कोट्यधिपती कार्यक्रमात भगवद्गीतेचे श्लोक सहजगत्या व पटापट उच्चारत गंगावतीच्या हुसेन बाशा याने एक कोटीचे बक्षीस मिळवले. हुसेनने सिद्धगंगा मठातच शिक्षण घेतले. बक्षीस मिळवल्यानंतर हुसेन आधी स्वामींच्या दर्शनासाठी सिद्धगंगा मठ गाठला होता.   

मुलांमध्येच देव पाहिला 
दोन महिन्यांपूर्वी श्री शिवकुमार स्वामी यांची प्रकृती बिघडल्याने चेन्नईच्या रेला रुग्णालयात दाखल केले होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ते आयसीयूमध्येच इष्टलिंग पूजा करत होते. तेव्हा डाॅ. मोहमद रेला यांनी त्यांना विचारले, 'स्वामीजी आपण रोज पूजा करता ना? आपणास ईश्वराचे दर्शन झालेय ?' त्यावर स्वामीजी हसत म्हणाले, 'होय, मी देव पाहिलाय.' तर देव कुठे आणि असा आहे, हे आम्हालाही दाखवा, डाॅ रेला म्हणाले. त्यावर पुन्हा हसत स्वामीजी म्हणाले, 'एकदा आमच्या मठाला या आपल्याला दहा हजार देव दाखवेन.' हे उत्तर ऐकून डाॅ. रेला आश्चर्यचकित झाले. स्वामीजी पुढे म्हणाले, 'होय, माझ्यासाठी मुलेच देव आहेत. त्यांच्यातच मी देव पाहिलाय. मठातील मुलांसाठीच मी रोज इष्टलिंग पूजा करतो. हे उत्तर ऐकून डाॅ. रेला काही काळ स्तब्ध झाले. 

थक्क करणारी दिनचर्या 
श्री शिवकुमार स्वामी यांची दिनचर्या विस्मयकारक व थक्क करणारी होती. रात्री दोन वाजता झोपेतून उठणे, पूजा, ध्यान, भक्तांसह वेदमंत्र, वचने, भक्तिगीत गायन, गुरु, लिंगव जंगमाराधना, इष्टलिंगार्चनेनंतर प्रसादग्रहण, विद्यार्थ्यांसह प्रार्थना, मार्गदर्शन, भाविकांना दर्शन, मठाची कार्यालयीन कामे, पुन्हा रात्री स्नान, पूजा, वाचन आदी संपवून ते रात्री अकरा वाजता झोपायचे. सुरुवातीची अनेक वर्षे ते मठातील बांधकाम, शेतातील पिके काढणे, गायीसाठी चारा कापून आणणे आदी कामे करायचे. तसेच वर्गावर जाऊन विद्यार्थ्यांना शिकवायचे. मात्र, मठाची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांच्या दिनचर्येत कोणताही बदल झाला नाही.  
अप्पासाहेब हत्ताळे, सोलापूर 
९०४९२९०१०१
ReplyForward
- August 12, 2019
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

माध्यमाची शक्ती अन् अहंकारी नेतृत्वाचा शेवट

  धारवाड… कर्नाटकातील ‘विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळखले जाणारे शहर. पण याच शहराने एक काळ असा पाहिला, जेव्हा शिक्षण, संस्कृती आणि प्रगतीच्या ओळ...

  • ವೀರಶೈವ ಲಿಂಗಾಯತ ಹಿಂದೂಸಂಸ್ಕೃತಿಯ ಭಾಗ
    ವೀ ರಶೈವ-ಲಿಂಗಾಯತ ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮಕ್ಕಾಗಿ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಹೋರಾಟ ಸದ್ಯಕ್ಕೆ ತಣ್ಣಗಾಗುವ ಲಕ್ಷಣವಿಲ್ಲ. ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮದ ಬೇಡಿಕೆಯು ಧರ್ಮವನ್ನು ಇಬ್ಭಾಗಗೊಳಿಸು...
  • ಲಿಂಗಾಯತ, ವೀರಶೈವ, ಹಿಂದೂ ಪದಗಳ ಸುತ್ತಮುತ್ತ…
    ಎಲ್ಲ ವೀರಶೈವರು ವೇದಗಳಲ್ಲಿ ಶ್ರದ್ಧೆ ಹೊಂದಿದ್ದು, ಹಲವು ದೈವಗಳಲ್ಲಿ ಭಕ್ತಿಯಿರುವವರು. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ವೇದ-ಸಂಸ್ಕೃತ ಪಾಠಶಾಲೆಗಳನ್ನು ಹಲವು ವೀರಶೈವ ಮಠಗಳು ನ...
  • संत साहित्याचे अभ्यासक : दा. का. थावरे
    माझ्या शालेय आणि पुढे महाविद्यालयीन जीवनात ‘ दैनिक संचार ’ मधील ‘ नौबत ’ आणि ‘ चिंतन ’ या दोन सदरांचा माझ्यावर प्रभाव राहि...

Search This Blog

  • Home

About Me

My photo
अप्पासाहेब चंद्रकांत हत्ताळे. निंबर्गी, ता. दक्षिण सोलापूर गेल्या 20 वर्षांपासून मराठी पत्रकारितेत
View my complete profile

Report Abuse

Blog Archive

  • ►  2026 (1)
    • ►  May (1)
  • ►  2025 (1)
    • ►  July (1)
  • ►  2024 (17)
    • ►  September (1)
    • ►  August (16)
  • ►  2023 (26)
    • ►  September (10)
    • ►  August (1)
    • ►  July (1)
    • ►  April (2)
    • ►  March (1)
    • ►  February (11)
  • ►  2021 (3)
    • ►  November (1)
    • ►  August (2)
  • ►  2020 (2)
    • ►  February (2)
  • ▼  2019 (5)
    • ▼  August (5)
      • सार्थक जीवन जगून सागराला मिळालेली गंगा
      • कन्नड गीत
      • त्रिविध दासोही शिवकुमार स्वामी
      • काश्मीर आता खरा भारताचा मुकुटमणी !
      • सिद्धगंगेचा लोकजंगम
  • ►  2018 (8)
    • ►  May (1)
    • ►  March (6)
    • ►  February (1)
  • ►  2017 (30)
    • ►  November (2)
    • ►  October (1)
    • ►  April (1)
    • ►  March (5)
    • ►  February (21)
Simple theme. Powered by Blogger.