Monday 4 September 2023

हिंदू वीरशैव लिंगायत मंच राष्ट्रैक्यासाठी कटिबद्ध

समाजातील विकृत शक्ती राष्ट्रीय एकतेला बाधा पोहोचविण्यासाठी धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय षड्यंत्र निर्माण करीत आहेत. राष्ट्रैक्य टिकून राहण्यासाठी समाजातील राष्ट्रवादी विचाराच्या जागरूक कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाखाली ‘हिंदू वीरशैव लिंगायत मंच’ स्थापन केला. त्या अंतर्गत संघटितपणे जनजागृतीसह समाजाचे प्रश्न सरकारदरबारी मांडण्यास सुरुवात केली आहे. 



देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व भारतीयांनी एकजुटीने लढा दिला. त्यात धर्मभेद, जातिभेद, प्रांतभेद असा कोणताही भेद नव्हता. केवळ भारतीयता होती. मात्र, इंग्रजांनी फोडा आणि झोडा या नीतीचा वापर करत कधी धर्म, कधी जाती, कधी भाषा, कधी प्रांतभेदाच्या आधारावर दुहीची बीजे पेरली. धर्माच्या आधारावर देशाचे त्रिविभाजन म्हणजे फाळणी ही त्याचीच परिणिती होती. तर स्वातंत्र्यानंतर सत्तांध काँग्रेसनेही केवळ मतांच्या राजकारणासाठी विशिष्ट समाजाच्या लांगूलचालनासह येथील मूळ हिंदू धर्मात फूट पाडण्याची इंग्रजांचीच नीती अवलंबली. परिणामी देशाला सतत दहशतवाद, फुटीरतावादासह धर्म, जाती, भाषा व प्रांतभेदाला सामोरे जावे लागत आहे. आज गेल्या काही महिन्यांपासून जळत असलेला मणिपूरही स्वार्थी राजकारणाचाच परिपाक आहे, हा इतिहास आहे. तर कर्नाटकातील सत्तांतरानंतर पुन्हा स्वतंत्र लिगायत धर्माची हाक दिली जात आहे. पाच वर्षांपूर्वी राजकीय फटका बसल्यानंतर गाडले गेलेले ‘भूत’ पुन्हा वीरशैव लिंगायत समाजाच्या मानगुटीवर बसविण्याचे कारस्थान रचले जात आहे. तेव्हा राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित समाजबांधवांनी केलेल्या विरोधानंतर ‘मौन’ झालेले स्वतंत्र लिंगायत धर्मसमर्थक कर्नाटकातील सत्तांतरानंतर पुन्हा भूछत्राप्रमाणे अवतीर्ण झाले, याचा सरळ अर्थ त्यांना काँग्रेसची राजकीय कुमक आहे, असाच होतो. राष्ट्रीय एकतेलाच बाधा पोहोचविणार्‍या या धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय षड्यंत्राविरोधात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाखाली वीरशैव लिंगायत समाजातील राष्ट्रवादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी हिंदू वीरशैव लिंगायत मंच या नावाने संघटितपणे जनजागरण चालविले आहे. लवकरच त्याचे दृश्य परिणाम दिसणार असून त्यातून समाजजागृतीला मोठी चालना मिळणार आहे.
गेल्या काही वर्षांत महात्मा बसवण्णांसह शिवशरण हे संस्कृतविरोधी होते, त्यांनी वेद नाकारला. इतकेच नव्हे तर वीरशैव आणि लिंगायत वेगवेगळे आहेत. लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे, या विचाराला कै. प्रा. एम. एम. कलबुर्गी, कै. चंद्रशेखर पाटील आदी काँग्रेसपोषित तथाकथित पुरोगामी विचारवंत आणि स्वार्थी राजकारणी यांनी जाणीवपूर्वक खतपाणी घातले, आताही घातले जात आहे. त्यासाठी बसवण्णांसह शिवशरणांनी रचलेल्या वचन साहित्याचा आधार देत आहेत. देशात सातव्या शतकापासून विविध प्रांतात वेगवेगळी भक्तिपंथाची चळवळ निर्माण झाली, तशी बाराव्या शतकात महात्मा बसवण्णांच्या नेतृत्वाखाली शरण चळवळ निर्माण झाली. शिवशरणांनी वचन साहित्याची निर्मिती केली. त्यामागे केवळ सामाजिक नवजागरणच नव्हे, तर भक्ती, आध्यात्मिक प्रेरणाही होती. वचन साहित्याच्या निर्मितीमागचा उद्देश स्वत: चेन्नबसवण्णा यांनी स्पष्ट केला आहे. मानवी मनाची मलीनता दूर करुन त्यांच्या हृदयात आत्मज्ञानाचा प्रकाश निर्माण करण्यासाठी वचन नावाच्या ज्योतीची निर्मिती केल्याचे म्हटले आहे.
पाताळातील शुद्ध जल काढता येईल का,
दोराविना अथवा सोपानांच्या आधाराविना?
शब्दसोपान बांधुनी चालविले शरणांनी,
देवलोकाचा हाच मार्ग पहा.
मर्त्य मानवाच्या मनाची मलिनता जावी म्हणून,
गीतबोलरूपी ज्योती प्रकाशित करुन दिली,
कूडल चेन्नसंगय्याच्या शरणांनी.
तत्कालीन हिंदू समाजाला एकसंध, एकजिनसी बनविण्यासाठी बसवण्णांनी पुरातन वीरशैव मताचे पुनरुज्जीवन, उपनिषकालीन मूल्यांची पुनर्स्थापना केली. मात्र, तथाकथित पुरोगामी विचारवंतांनी काही वेदविषयक वचनांना धरुन शिवशरणांना वेदविरोधी ठरविण्याचा खटाटोप चालविला आहे. केवळ साहित्याला धरुन भक्ती, अध्यात्म याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. सर्वच शिवशरण महात्मा बसवण्णांचा भक्तिभंडारी असा गौरव करतात. तर अध्यात्म म्हणजे ईश्‍वराचा मार्ग हा एकीकरणासाठी आहे, विभाजनासाठी नव्हे ! अध्यात्मात विरोध नाही. बसवण्णांची केवळ पाच वचने वरवरुन वेदविरोधी वाटतील अशी तर एक वचन वेद समर्थनात आहे. तर अल्लमप्रभूंचे एक वचन वेदविषयक आहे. त्या एकाच वचनाच्या आधारे त्यांना वेदविरोधी ठरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर अक्कमहादेवी आजच्या विचारवंतांनी निर्माण केलेल्या या गोंधळात कुठे दिसत नाही, तिचे ‘लोक’च वेगळे ! महात्मा बसवण्णांच्या वेदविरोधी म्हटल्या जाणार्‍या वचनांवर स्वतंत्र धर्म आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर खूप मंथन झाले आहे. आता आपण अन्य शिवशरणांची काही वचने पाहूया. अल्लमप्रभू म्हणतात,
वेद म्हणजे वाचायची गोष्ट,
शास्त्र म्हणजे बाजारगप्पा,
पुराण म्हणजे पुंडांच्या गोष्टी,
भक्तीतर्क म्हणजे एडक्यांची टक्कर,
भक्ती म्हणजे नैवेद्य दाखवून जेवण्याचा लाभ,
गुहेश्‍वर म्हणजे मात्र अतीत परतत्त्व.
यात कोठेही वेद, शास्त्र अथवा पुराणाचा विरोध दिसत नाही. वेद ही केवळ वाचण्याची गोष्ट नव्हे तर आचरणात आणायची बाब आहे. शास्त्र ही बाजारातील गप्पा ठरू नये. आपल्या वाईट गोष्टींच्या समर्थनासाठी पुराणाचा वापर नको, दुसर्‍यांना हानी पोहोचविण्यासाठी, एडक्यांप्रमाणे भांडण्यासाठी तर्क असू नये. भक्ती ही दिखावा, लाभाची गोष्ट ठरू नये, असे म्हटले आहे. जर ते वेदविरोधी असते तर अनेक वचने लिहायला हवी होती. मात्र, तसे दिसत नाही. तसेच स्वत: वचनेच उपनिषदाचा कंठरवाने उद्घोष करताना दिसतात. ईशावास्य उपनिषदातील खालील श्‍लोक पाहा.
ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ।
सच्चिदानंदघन परब्रह्म हे परिपूर्ण व अनंत आहे. त्यामुळे त्याच्यापासून निर्माण झालेले हे जगही पूर्ण आहे. म्हणजेच सर्व चराचर सृष्टी परमात्मतत्त्व व्याप्त आहे. अर्थातच प्रत्येक व्यक्तीतील आत्मतत्त्व परमात्मा तत्त्वाचाच अंश आहे, असे म्हटले आहे. या मंत्रात ऋषींनी मांडलेला अत्यंत मूलभूत विचारच अक्कमहादेवी यांनी पुढील वचनात मांडला आहे.  
बयलु बयलुचि पेरुनि
बयलु बयलु झाले,
बयलु बयलुचि पिकवुनि
बयलु बयलु झाले,
स्वत: चन्नमल्लिकार्जुन बयलु
ईशावास्य उपनिषदातच म्हटले आहे,
ईशा वास्यमिदं सर्वं यत्किष्च जगत्यां जगत् ।
तेन त्यक्तेन भुञ्जीथा: मा गृध: कस्य स्विद्धनम् ॥
या जगात कोणतीही गोष्ट शाश्‍वत नाही. या बदलत्या जगाला व्यापून उरणारा परमेश्‍वर मात्र शाश्‍वत आहे. तो सर्वत्र आहे. कोणाचीही संपत्ती मिळविण्याची अभिलाषा धरू नये. असे या श्‍लोकाचा अर्थ आहे. वचनकार जेडर दासिमय्याही आपल्या वचनात हेच सांगतात,
जमीन तुझे, जल तुझे
फिरुनी घोंघावणारा वारा तुझा
तुझे अन्न खाऊन दुसर्यांची
स्तुती करणारे हीन कुळाचे जाणा रामनाथा ॥
संपूर्ण चराचरात एकच ईश्‍वर आहे. त्याचे अन्न खाऊन दुसर्‍यांची स्तुती करणारे हीन आहेत. दुसर्‍यांच्या वस्तूची अभिलाषा बाळगू नये, असे या वचनात म्हटले आहे. भगवंताच्या दारी सत्य एकच आहे. कोठे भिन्नता आहे ? अल्लमप्रभू म्हणतात,
सत्यही नाही, असत्यही नाही
सहजही नाही, असहजही नाही
मी नाही, तू नाही
नाही हे स्वत: नाही
स्वत: गुहेश्‍वर बयलु ।
या जगात कोणतीही गोष्ट शाश्‍वत नाही. तो परमेश्‍वर एकच सत्य आणि अनंत असल्याचे या वचनात म्हटले आहे. नेति नेति म्हणत उपनिषदांनी हेच सांगितले आहे. वचनसाहित्याचा अभ्यास केल्यास या भूमीतील धार्मिक, आध्यात्मिक ऐक्य साधण्यासाठी शिवशरणांनी उपनिषदकालीन मूल्येच समाजमनात रूजविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. उपनिषदातील श्‍लोकाशी साधर्म्य राखणारी अनेक वचने असून तीच मूल्ये शिवशरणांनी लोकभाषेत वेगळ्या प्रकारे मांडली आहेत. वचन साहित्य षट्स्थल चौकटीत आहे. वचन साहित्याच्या विकासक्रमाचा विचार केल्यास उगम, संकलन व विस्तार आणि टीका या तीन काळात विचार करता येईल.  वचनांच्या उगमकाळात षट्स्थलाची चौकट नव्हती, ती शुद्ध होती. परंतु संकलन काळात ती षट्स्थलाच्या चौकटीत बद्ध करण्यात आली. कारण बसवण्णा, अल्लमप्रभु, सिद्धराम, चेन्नबसवण्णादी शरणांचीच वचने या चौकटीत आहेत, इतर शरणांच्या वचनांत ती चौकट नाही. तरीही समाजात फूट पाडून आपली राजकीय पोळी भाजणारे स्वार्थांध राजकारणी व त्यांच्याकडून पोषित तथाकथित बुद्धिमंत वीरशैव लिंगायत हा हिंदू धर्माचाच भाग असल्याचे मानण्यास तयार नाहीत.
गेल्या काही वर्षांपासून लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे, त्यास मान्यता मिळावी. तसेच अल्पसंख्याक दर्जा मिळावा, यासाठी काही हिंदूविरोधी राजकीय नेते, लिंगायत समाजातील स्वयंघोषित नेते आणि त्यांचे समर्थक प्रयत्नशील आहेत. मात्र, कायदेशीर बाजू तपासता ही मागणी कदापिही मान्य होणारी नाही. देशाचे रजिस्ट्रार जनरल यांनी तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यालयाला दि. 14 नोव्हेंबर 2013 रोजी लिहिलेले एक पत्र महत्वाचे आहे. तेव्हाच्या गृहमंत्रालयाने लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे का, याबद्दल रजिस्ट्रार जनरलचे मत मागविले होते. रजिस्ट्रार जनरल यांनी लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा प्रस्ताव फेटाळला होता. याची दोन प्रमुख कारणे दिली होती. एक म्हणजे लिंगायत हे हिंदू धर्माचाच एक घटक आहेत, हे स्पष्ट करताना रजिस्ट्रार जनरल यांनी सरकारचेच जुने निर्णय, कर्नाटक उच्च न्यायालयाचे मत आणि आधीच्या जनगणनेचा हवाला दिला होता. लिंगायतांना आधी वीरशैव म्हटले जायचे, ती धर्मातीलच एक जात आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा दिला तर या समाजातील अनुसूचित जातीच्या लोकांना सध्या मिळणार्‍या आरक्षणापासून वंचित रहावे लागेल. तसेच हिंदू कायद्यात हिंदू म्हणजे कोण याची व्याख्या दिली असून त्यात वीरशैव व लिंगायतांना समाविष्ट केले आहे. तरीही काही स्वयंघोषित लिंगायत नेत्यांकडून लिंगायत हा स्वतंत्र धर्म असल्याबाबत 1967 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा कायम उल्लेख केला जातो. स्वामीनारायण हा पंथ हिंदू धर्माचा भाग नसून तो स्वतंत्र धर्म असल्याबाबत मान्यता देण्यासंबंधी मागणी केलेली ही अपील याचिका आहे. याच्या निकालात न्यायालयाने महात्मा बसवेश्‍वरांचा उल्लेख हिंदू धर्मसुधारक असा केला आहे. अशाप्रकारे स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळणे दुरापास्त असल्याने समाजातील काही नेत्यांनी अल्पसंख्याक दर्जा मिळावा, ही मागणी पुढे आणली. यामागे शिक्षण संस्थाचालकांना अल्पसंख्याक म्हणून मिळणार्‍या अनियंत्रित शुल्क वाढ, सरकारी लेखापरीक्षणातून मिळणारी सूट आणि विद्यार्थ्यांसाठी सक्तीच्या आरक्षणात मिळणारी सूट हे कारण आहे. ही मागणी रेटणारे कोण, त्यांच्या संस्था कोणत्या हे समाजासमोर आहे. तर अल्पसंख्याक मान्यतेमुळे लिंगायत समाजातील काही मोजक्या जातींना मिळणारे आरक्षणही जाऊ शकते. तसे कर्नाटक सरकारच्या प्रस्तावावरील उत्तरात केंद्रीय समाजकल्याण मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या लिंगायत समाजातील काही जातींना ओबीसी आरक्षण मिळते. अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यास त्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. अल्पसंख्याक दर्जाच्या फायदा - तोट्याचा विचार केल्यास फायद्यापेक्षा तोटाच अधिक होणार आहे. त्यामुळे संपूर्ण वीरशैव लिंगायत समाजाला आरक्षण हाच यावर पर्याय उरतो. परंतु स्वतंत्र धर्म समर्थकांतही स्वतंत्र धर्म की अल्पसंख्याक दर्जा याविषयी गोंधळाचे वातावरण आहे. तर त्यांच्या लाभाच्या ‘लॉलीपॉप’ला भुलून काही सर्वसामान्य समाजबांधव त्यांच्यामागे फरफटत आहेत. धर्म हा कायदेशीरदृष्ट्या आणि अल्पसंख्याक दर्जा हा सामान्य समाजबांधवाच्या लाभाच्या दृष्टीने मृगजळ आहे.  
स्वतंत्र धर्म समर्थकांनी वीरशैव लिंगायत म्हटल्यास स्वतंत्र धर्माला मान्यता मिळणार नाही, म्हणून वीरशैव व लिंगायत वेगवेगळे असल्याची शक्कल लढवली. मात्र, वीरशैव लिंगायत समाजात पंचाचार्य आणि विरक्त या दोन्ही पीठांना मानणारे आहेत. त्यांच्यात दुही माजवून केवळ राजकीय स्वार्थ साधणे आणि शैक्षणिक संस्थांचे इमले उभे करणे हाच अंतस्थ हेतू आहेेे, यामागे समाजकल्याणाची कोणतीही भावना नाही. तसेच राष्ट्रीय ऐक्यभावनेलाही तडा जावा, हा डाव असल्याचे समाजातील मोठा वर्ग जाणून आहे. त्यामुळे समाजातील जागरुक राष्ट्रवादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाखाली हिंदू वीरशैव लिंगायत मंच या नावाने संघटितपणे जनजागरणासह समाजाचे प्रश्‍न सरकार दरबारी मांडण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र सरकारने लिंगायत समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी महात्मा बसवेश्‍वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करुन त्यासाठी 50 कोटी निधीचीही तरतूद केली. तसेच सोलापूरच्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्‍वर अध्यासनाची स्थापना केली. समाजाचे हे दोन्ही महत्वाचे प्रश्‍न मार्गी लागण्यामागे मंचाची भूमिका निर्णायक राहिली आहे.
 लिंगायत समाजातील स्वयंघोषित नेते, त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते धर्ममान्यता राहिली बाजूला, धर्मगुरू, जंगम समाज यांच्यावर टीकाटिप्पणी, शिव्याशाप देणे, प्रसंगी मारहाण करणे इतक्या खालच्या स्तराला पोहोचल्याचे दिसत आहे. त्यामुळे मंचाने संपर्क, साहित्याद्वारे समाजात जागृतीला सुरुवात केली. गुरुपौर्णिमा या उत्सवाला लिंगायत समाजातही विशेष महत्व आहे. त्यामुळे या निमित्ताने जंगम कृतज्ञता सोहळ्याची सुरुवात केली. हल्ल्यांप्रकरणी संबंधित प्रशासनाला निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. महाराष्ट्रासह कर्नाटकातील मान्यवर समाजबांधवांसह  मठाधीशांच्या भेटी घेऊन स्वतंत्र धर्म, अल्पसंख्याक दर्जा मागणी आंदोलनाद्वारे समाजात फूट पाडण्याचे षड्यंत्र, त्यामुळे समाजाचे होणारे नुकसान यासह धर्मांतर, लव्ह जिहाद या धर्मविरोधी आणि राष्ट्रविघातक कृत्यांविषयी अवगत केले. त्यामुळे मठाधीशांसह समाज जागरुक होत आहे. त्याचे दृश्यरुप म्हणजे दिवाळीपूर्वी लिंगायत समाजात मानाचे स्थान असलेल्या देशभरातील शिवाचार्यांची परिषद सोलापुरात होणार आहे. होटगी मठाच्या शाळेच्या प्रांगणात होणार्‍या या परिषदेत पाचही जगद्गुरू यावेत, असे नियोजन मंचाने केले आहे. यापैकी काशी, उज्जैनी आणि श्रीशैलम जगद्गुरूंनी मान्यता दिली आहे. केदारनाथ आणि रंभापुरी जगद्गुरूंशी यासंदर्भात मंचाने संपर्क केला आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणामधील सुमारे 500 शिवाचार्य या परिषदेस येणार आहेत. त्यासाठी शिवाचार्यांशी संपर्क सुरू आहे. राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाच्या मुद्यांवर सर्व शिवाचार्यांचे एकमत असावे, या दृष्टीने चर्चेचे स्वरुप राहणार आहे. वसुधैव कुटुम्बकम, संत आणि राष्ट्र, सर्वे संतु निरामया आदी विषयांवर संवाद होणार आहे. केवळ हिंदू वीरशैव लिंगायत समाजच नव्हे, तर व्यक्ती, राष्ट्र व समष्टीचे हितचिंतन होणार आहे. ही परिषद वीरशैव लिंगायत समाजाच्या इतिहासातच परिवर्तन घडविणारे ठरणार आहे.  
अप्पासाहेब हत्ताळे, सोलापूर 9049290101  

No comments:

Post a Comment

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...