Sunday 26 February 2017

विवेकानंदांच्या स्वप्नातील युवा घडवणारा अनोखा उपक्रम


२५, २६, २७ डिसेंबर २०१५ या कालावधीत देशभरातील युवकांचे कन्याकुमारी येथे सार्थक युवा समर्थ भारत हे शिबिर झाले. संपूर्ण देशभरातून ६८० युवक - युवती यात सहभागी झाले होते. युवा शक्तीतील सेवाभाव जागवणाऱ्या या उपक्रमाचा वेध घेणारा हा लेख.
विवेकानंद केंद्र कन्याकुमारीने केंद्राचे संस्थापक एकनाथ रानडे यांच्या जन्मशती पर्वानिमित्त या शिबिराचे आयोजन केले होते. स्वामी विवेकानंदांनी कन्याकुमारी येथे तीन सागरांच्या संगमावर २५, २६ व २७ डिसेंबर १८९२ या तीन दिवसांत तप केले होते. त्या तपश्चर्येअखेर स्वामीजींना आपले जीवितध्येय गवसले. या राष्ट्रचिंतन पर्वकाळाचे औचित्य या शिबिराला लाभले होते. विवेकानंद म्हणतात, पावित्र्याच्या तेजाने झळाळलेले; ईश्वरनिष्ठेचे वज्रकवच ल्यालेले, मृगेंद्राची हिंमत असलेले आपल्या पीडत, दु:खित, पददलित समाज बांधवाविषयी करुणा असलेले असे लक्षलक्ष युवक युवती मुुक्तीचा, सहकार्याचा, सामाजिक उत्थानाचा, एकात्मतेचा संदेश देत साऱ्या भारतभर संचार करतील तेव्हाच भारताचा भाग्योदय होईल. स्वामीजींच्या राष्ट्रचिंतन पर्वकाळातील हे शिबिर त्यांच्या स्वप्नातील युवक घडणीसह त्यांच्यात त्यांंना अपेक्षित सेवाभाव जागवणारे ठरले.
कन्याकुमारी येथील सागरतटावर हिरवाईने नटलेला विवेकानंदपुरमचा विस्तीर्ण असा परिसर. येथे २४ डिसेंबर रोजी आसाम, अरुणाचलपासून गुजरातपर्यंतच्या, हरयाणापासून केरळपर्यंतच्या तरुण - तरुणी झुंडी - झुंडीने दाखल झालेल्या. नोंदणीनंतर देशभरातल्या विविध प्रांतातील शहर, गावावांमधून आलेल्या या तरुण-तरुणी वेगवेगळ्या मंडल व गणश: शिस्तीने बसलेल्या. भजनसंध्येत ओंकाराच्या एकत्रित उच्चारातून एकत्वाचे दर्शन. दरम्यान, सगळ्यांनी आपाापले मोबाईल बंद आणि ते गणप्रमुखांकडे सुपूर्द करुन शरीर, मनाने स्वघडणीसाठी सिद्ध झालेले.
दुसऱ्या दिवसापासून मुख्य शिबिराला सुरुवात. पहाटे साडेचारला उठून योगसत्रासाठी तयार झालेले. आपापल्या गणप्रमुखांच्या मार्गदर्शनानुसार शिस्तीने रांगेत मार्गस्थ होताहेत. पहाटेच्या नीरव शांततेत कौन चले भाई कौन चले, स्वामीजी के वीर चले, भारत माता की जय, आज के आनंद की, जय विवेकानंद की आदि उत्साहपूर्ण घोषणा, त्यानंतर मंथन, गणश: चर्चा, मंडलश: सादरीकरण, क्रीडायोग, भजनसंध्या असे रात्री दहापर्यंत शिबिराचा दिनक्रम. सारे काही शिस्तीत, वेळेवर आणि गणप्रमुखांच्या सूचनेनुससार, एकत्वाने. स्वामी विवेकानंद म्हणतात, सगळ्यांनी मिळून एकत्र काम करणे हे आपल्या मुळी स्वभावातच नाही. या दोषामुळेच तर आपली ही दुर्दशा झालेली आहे. ज्याला आज्ञा पाळायची कशी ते समजते, त्यालाच आज्ञा कशी द्यावयाची हे समजते. प्रथमत: आज्ञाधारकपणा शिका.
विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष पी. परमेश्वरन, उपाध्यक्ष बालकृष्णन व ६५ हजार तरुणांना रोजागार दिलेले भारत विकास ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले. गायकवाड यांनी विवेकानंदांच्या विचाराने जीवनाला दिशा मिळाल्याचे सांगत आपल्या सफल व सार्थक जीवनाचे अनुभव कथन केले. तर परमेश्वरन यांनी वंचित लोकांची सेवा करणे ही प्रत्येक मनुुष्याचे कर्तव्य असल्याचे सांगितले. ते म्हणाले, कर्तव्य हे एका दिवसाचे कार्य नव्हे तर समर्पण व नित्य साधनेने कर्तव्य भाव प्रगट होईल. तर बालकृष्णन म्हणाले, देशवासियांमध्ये त्याग व सेवाभाव जाग्रत झाला तरच भारत जगद्गुरू बनेल.
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचा समारोप झाला. त्यांनी मार्गदर्शनाअभावी तरुण मागे राहत असल्याचे सांगतानाच कुटुंबियांसह सेवाकार्याशी जोडण्याचे आवाहन केले. यावेळी केंद्राच्या उपाध्यक्ष बी. निवेदिता यांनी शिवसुंदर नवसमाज घडवण्यासाठी आणि राष्ट्राला पुनर्वैभव प्राप्त करुन देण्यासाठी समर्पित वृत्तीने सेवाकार्य करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, तीन दिवसांत तरुण - तरुणींनी सेवाविषयक विविध आयामांवर गणश: चर्चा केली. मंडलश: सादरीकरणातून तरुणाईच्या विकसित व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडले. सफलता, सार्थकता, सेवा की अवधारणा, महान त्याग से महान कार्य या विषयांचा मंथनात समावेश होता. तसेच सफलता से सार्थकता, शिवसुंदर नवसमाज विश्ववंद्य हम गढें, मन, वाचा, कर्म से सदैव एकरुप हो, नवगौरव इतिहास रचें अब अपनी ही बारी है यावर बी. निवेदिता, केंद्राचे सरचिटणीस भानुदास धाक्रस, शिबिर प्रमुख सौमित्र पुजारी यांचे बौद्ध्रिक झाले.
केंद्राचे संस्थापक एकनाथ रानडे यांच्या जन्मशतीनिमित्त केंद्राने युवा कौशल्य विकासाचा कार्यक्रम अाखला होता. त्याअंतर्गत कथा शिलास्मारकाची यावरील पीपीटी, भारतीय संस्कृती परीक्षा आदी उपक्रमांतून केंद्राच्या अनेकविध सेवकार्यात सहा महिने कार्यरत तरुण - तरुणींची या शिबिरासाठी निवड केली होती. जन्मशती पर्वाचा समिधा कार्यक्रमाने त्यापूर्वीच समारोप झाला असला तरी या शिबिराने त्याचा खऱ्या अर्थाने समारोप झाला. शिबिरातील तिसऱ्या दिवशी एकनाथजींंच्या समाधीस्थानी समर्पणाचे आयोजन करण्यात आले होते. सेवाकार्याने राष्ट्रीय भावना व सांस्कृतिक बंध घट्ट करणाऱ्या या कर्मयोग्याच्या समाधीस्थळावर नतमस्तक होेताना सहभागी बंधू, भगिनी मनोमनी या शिबिराचे गीत गुणगुणत होते,
सेवा है यज्ञकुंड समिधा सम हम जले।
ध्येय महासागर में सरितरुप हम मिले।
लोकयोगक्षेम ही राष्ट्र अभयगान है।
सेवारत व्यक्ति व्यक्ति राष्ट्र का ही प्राण है।

No comments:

Post a Comment

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...