Friday 24 February 2017

विजयपूरचे ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामी

संपूर्ण कर्नाटकासह महाराष्ट्रातील सीमाभागातील जनमानसांत श्री सिद्धेश्वर स्वामी यांचे अनन्यसाधारण स्थान आहे. या भागातील समाजमनावर त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा प्रभावही दिसून येतो. त्यांचे प्रवचन ऐकणारे त्यात मंत्रमुग्ध होऊन जातात. कोठेही त्यांच्या प्रवचनाचे आयोजन केल्यावर हजारोंच्या संख्येने लोक हजेरी लावतात. एक तासाचे त्यांचे प्रवचन तितक्याच तन्मयतेने ऐकतात. नीरव शांतता, त्यांची रसपूर्ण भाषा, लकब,  उदाहरणे, जगभरातील संतसज्जनांसह तत्वज्ञ, साहित्यिक, शास्त्रज्ञ यांची उद्धरणे यांसह आजच्या काळाशी घातली जाणारी सांगड. तसेच भूमी, जल, वृक्ष, फुले,  पशू, पक्ष्यांसह निसर्गातील प्रत्येक वस्तूत चैतन्यजीव आहे, याचे विवरण करण्याची त्यांची  अद्भुत शैली.  आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं बोलणं.
‘बोलणं मोत्याच्या हारासारखं असावं. बोलणं माणकाच्या दीप्तीसारखं असावं. बोलणं स्फटिकाच्या शलाकेसारखं असावं. बोलणं लिंगानेही प्रशंसा करण्यासारखं असावं. बोलल्याप्रमाणे वागले नाही, तर
कूडलसंगमदेव कसा प्रसन्न होईल ?’ या श्री महात्मा बसवण्णांच्या  वचनाप्रमाणे त्यांची वाणी मधूर आहे. ते केवळ शरण साहित्याचे भाष्यकारच नव्हेत तर शरणश्रेष्ठ बसवण्णांच्या  मृदुवाणितचि असे सारे जप ! मृदुवचनी असे सारे तप ! सद्विनयाने सदाशिवाची होई करुणा, कूडलसंगमेशासी न रुचे याविना ! या वचनाइतकेच त्यांचे वचन मृदु आहे, ते विनयशील आहेत. त्यांची साधी जीवनशैली तितकीच प्रेरणादायी आहे. शरणविचार त्यांच्या जीवनाचा गाभा आहे. ते केवळ संतच नव्हे तर ज्ञानोपासक,  प्रेरक प्रवचनकार, आध्यात्मिक चिंतक, श्रेष्ठ महानुभाव आहेत. अनेक संत होऊन गेले, आजही आहेत. मात्र, ज्ञानयोगी दुर्मिळ. त्यापैकीच एक श्री सिद्धेश्वर स्वामी. आद्य शंकराचार्य, ज्ञानयोगी श्री संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, शून्य सिंहासनाधीश्वर अल्लमप्रभू  यांच्या ज्ञान, अध्यात्मविचारांचे ते वाहक आहेत. त्यांचे विचार सज्जनपोषक आहेत.
विजयपूरचे ज्ञानयोगाश्रम हे गदगचे श्री शिवानंद महास्वामी यांच्या परंपरेतील आश्रम. सिद्धेश्वर स्वामी यांचे गुरू श्री वेदांत केसरी श्री मल्लिकार्जुन स्वामी यांच्या काळात शिक्षणासह अन्य सेवाकार्यामुळे उत्तर कर्नाटकातील जनमानसांत महत्वाचे स्थान मिळवले. आश्रमाच्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेण्यास आलेल्या हजारो मुलांपैकी सिद्धेश्वर स्वामी हेही एक. विजयपूर जिल्ह्यातीलच बिज्जरगी गावी २४ आॅक्टोबर १९४१ रोजी त्यांचा जन्म झाला. गावातच चौथीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर ते मल्लिकार्जुन स्वामी यांच्याकडे आले. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, या म्हणीप्रमाणे बालक सिद्धेश्वराची तीक्ष्ण बुद्धिमत्ता त्यांच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही. ते प्रवचनासाठी त्यांनाही सोबत न्यायचे. तसेच त्यांच्या शालेय, महाविद्यालयीन शिक्षणाचीही काळजी घेतली. कर्नाटक विद्यापीठात पदवी घेतल्यानंतर त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून तत्त्वशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. दरम्यान, त्यांनी गुरु श्री मल्लिकार्जुन स्वामी यांच्या प्रवचनांचे संकलन प्रकाशित केले. त्यावेळी त्यांचे वय केवळ १९ वर्षे होते, हे विशेष.
पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर विजयपूरच्या आश्रमात परतलेल्या सिद्धेश्वरांना भगवद्गीता, उपनिषद, योगसूत्रे, वचनशास्त्र या विषयी मार्गदर्शन करत त्यांचे ज्ञानात भर घातली. गुरुमुखातून घेतलेल्या या ज्ञानाद्वारे सिद्धेश्वर स्वामी बोधप्रद प्रवचन करत आहेत. गहन वेदांत तत्त्वे जनमानसांत रुजावीत, यासाठी त्यांचे सोप्या शब्दांत निरुपण हे सिद्धेश्वर स्वामी यांचे वैशिष्ट्य होय. ते केवळ आध्यात्मिक संतच नव्हे तर विज्ञाननिष्ठ, अंधश्रद्धा निर्मूलक, पर्यावरणवादी, समाजातील अनुचित रुढी, पंरपराविरोधी आहेत. ते आपल्या प्रवचनांतून आणि प्रवचनाच्या ठिकाणी संध्याकाळी चिंतन बैठकांमध्ये यावर जनप्रबोधन करतात. ज्ञानयोगाश्रमाचे प्रमुख या नात्यानेत त्यांच्या गुरुंचे शैक्षणिक कार्य पुढे चालवत आहेत.
स्वामी विवेकानंद म्हणतात, ईश्वर सर्वव्यापी आहे. मनुष्यात ईश्वराला पाहणे त्याच्या सर्वव्यापकतेचे एक उदाहरण आहे... त्याप्रमाणे माझे काय आहे, सर्वकाही त्या भगवंताचे, इथला प्रत्येक माणूस देव. प्रत्येकात ईश्वराला पाहावे. मीपणा नको. ईहपर दोन्ही एकच हा विचार जनमनांत रुजवत त्या मार्गावर चालणारे श्री सिद्धेश्वर स्वामी हे दुर्मिळ योगी आहेत.



No comments:

Post a Comment

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...