Sunday 26 February 2017

अभिनव सर्वज्ञ हर्डेकर मंजप्पा


अक्षयतृतीयेला घरोघरी साजरे होणाऱ्या बसवजयंतीला कर्नाटक गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्डेकर मंजप्पा यांनी सार्वजनिक रुप दिले. महात्मा बसवण्णांसह शरण साहित्य जनमानसांत रुजवण्यासह कर्नाटकातील साहित्य, पत्रकारिता, समाजकार्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचे योगदान अपूर्व आहे. त्यांची १८ फेब्रुवारी रोजी जयंती त्यानिमित्त हा लेख.
राष्ट्रकवी कुवेंपु म्हणतात, पूज्य हर्डेकर मंजप्पा हे एक ज्येष्ठ विभुती व्यक्ती.  आपले जीवनकार्य, शरण विचारांच्या आचरणाने विभुतीत्व प्राप्त केलेल्या मंजप्पा यांचा उत्तर कन्नड जिल्ह्यातील बनवासी या गावी जन्म झाला. मुलकी शिक्षणानंतर त्यांनी शिक्षकी पेशाला सुरुवात केली. मात्र, लोकमान्य टिळकांच्या स्वदेशी चळवळीने प्रभावित होऊन १९०६ मध्ये त्यांनी धनुर्धारी हे मासिक सुरू केले. त्याकाळी या मासिकाचे दहा हजार सभासद होते. विवाह केल्यास समाजकार्यात अडथळा येईल, यामुळे त्यांनी १९१० पासून निर्धारपूर्वक आजीवन ब्रह्मचर्य व्रताचे पालन केले. त्यांनी महात्मा बसवण्णांचा तत्कालीन समाजाला खरा परिचय करून दिला.  त्यासाठी संशोधनात्मक बसव चरित्र लिहिले. अक्षयतृतियेला घरोघरी साजऱ्या होणाऱ्या बसवजयंतीला त्यांनी सार्वजनिक स्वरुप दिले. १९१३ मध्ये त्यांनी दावणगेरे येथे सार्वजनिक बसवजयंती सुरू केली. सार्वजनिक बसवजयंतीचे ते उद्गाते आहेत. बसवण्णांसह शरणांचे विचार समाजमनापर्यंत पोहोचवणे हाच यामागचा  उद्देश होता.  तसेच त्यांनी बसव बोधामृत, वीरशैव समाज सुधारणे या ग्रंथांचेही लेखन केले. शरण संदेश या मासिकाच्या माध्यमातून शरण विचार घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर केवळ शरण विचारांचा प्रभावच नव्हता तर त्यानुसार त्यांचे आचरण होते. ते बसवण्णांचे खरे अनुयायी, शरण होते. त्यामुळेच कवी द. रा. बेंद्रे त्यांच्याविषयी म्हणातात, मंजप्पा हे जन्मत: मार्गदर्शक, शिक्षक, सुधारक. ते स्वभावत: प्रयोगशील शरण. त्यांची कृती,  त्यासाठी आवश्यक ज्ञानोदय हे आमच्या प्रदेशाचा भाग्योदय आहे. तर शरण साहित्याचे अभ्यासक सिद्धय्या पुराणिक म्हणतात, मंजप्पा हे अभिनव सर्वज्ञ, त्योच लेखन समाजनिर्मिती करणारे जिवंत साहित्य – ज्वलंत साहित्य, जीवनदायिनी साहित्य होय.
पुढे महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी राष्ट्रीय शिक्षणासाठी कार्य सुरु केले. १९२७ मध्ये आलमट्टी येथे विद्यालय सुरू केले. यात केवळ औपचारिक शिक्षणच नव्हे तर जीवन शिक्षण नावाने कौशल्याधारित शिक्षण दिले जायचे. त्यांनी संपूर्ण कर्नाटकात संचार करुन ग्रामविकासावर भर दिला. व्यसनमुक्तीसाठीही कार्य केले. १९२४ मध्ये बेळगावमध्ये भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या आयोजनात त्यांच्या बसवेश्वर सेवा दलाची अग्रगण्य भूमिका होती. त्यांनी महात्मा गांधी, भगवना बुद्ध यांचेही चरित्रलेखन केले. तसेच खादी, ब्रह्मचर्य, अहिंसा, सत्याग्रह धर्म हे ग्रंथही लिहिले. त्यांनी एकूण ४० हून अधिक पुस्तकांचे लेखन केले. त्यांनी उद्योग, बाल साहित्यावर आधारित मासिक सुरु केले.  कळेद नन्न ३० वर्षगळ काणिके हे त्यांचे आत्मचरित्र कन्नड साहित्यातील पहिले आत्मचरित्र आहे. महात्मा गांधी यांचे विचारही जनमानसांत रुजवण्यात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही कन्नड जनमनावर दिसून येतो. त्यांचे ३ जानेवारी १९४७ रोजी आलमट्टी येथे निधन झाले. कर्नाटक सरकारने तेथे त्यांचे स्मारक उभारले आहे.

वारद यांचे चरित्रलेखन
हर्डेकर मंजप्पा यांनी वारद मल्लप्पनवर चरित्रे या नावाने पुण्यश्लोक अप्पासाहेब वारद यांच्या चरित्राचे लेखन केले. महात्मा बसवणांसह शरण विचाराविषयी अत्यंतिक आस्था, त्याच्या प्रचार, प्रसारासाठी प्रयत्न व त्यानुसार आचरण हे हर्डेकर व वारद यांच्यातील समान स्थायीभाव होता.

No comments:

Post a Comment

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...